लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंध कडक : जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार
प्रतिनिधी / बेळगाव
लोकांनी गर्दी टाळणे महत्त्वाचे आहे. कारण गर्दीमुळेच कोरोनाचा फैलाव वाढू शकतो. तेव्हा गर्दीच्या ठिकाणी कोणीही जाऊ नये आणि गर्दी करू नये. कोविडच्या नियमांचे पालन करावे, सर्व नियमांचे पालन केले तर सर्वांनी मिळून कोरोनावर नियंत्रण मिळवू शकतो, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱयांची बैठक घेऊन त्यांनी कोविडबाबतची माहिती दिली. आम्ही लॉकडाऊन करणार नाही. मात्र, सरकारने आदेश दिल्यानंतर त्या आदेशाचे पालन करणे आमचे कर्तव्य आहे. एकाच ठिकाणी अनेक जण थांबून चर्चा करत असतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. मास्क न घालता खरेदीसाठी दुकानात आले असता दुकानदारांनी संबंधितांना वस्तू देऊ नयेत. मास्क नसल्यास कोणालाही आत येण्याची परवानगी देऊ नये, अन्यथा मास्क न घातलेल्या व्यक्तीवर तसेच दुकान मालकावरही दंडात्मक कारवाई तसेच गुन्हाही दाखल केला जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले.
कोरोनाबाबतची लक्षणे आढळल्यानंतर तातडीने कोविडची चाचणी करून घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या कोरोनाची रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे आता प्रत्येकाने काळजी घेणे महत्त्वाचे आहे. काम नसताना विनाकारण बाहेर फिरणे टाळावे, याचबरोबर मास्क व इतर नियमांचे पालन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मतमोजणीसाठी तयारी पूर्ण
मतमोजणीबाबत सर्व ती तयारी पूर्ण केली आहे. कोविडचे नियम पाळूनच मतमोजणी केली जाईल. सर्वांनी सहकार्य करणे महत्त्वाचे असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले. यावेळी मनपा आयुक्त जगदीश के. एच. यांनीही कोविडबाबत सर्व ती तयारी केली असल्याचे स्पष्ट केले. विवाह व कोणताही समारंभ असल्यास परवानगी घेणे बंधनकारक आहे. सरकारने दिलेल्या नियमानुसारच हे सर्व कार्यक्रम करणे गरजेचे आहे, असे सांगत कोविडबाबत महापालिकेने सर्व ती दक्षता घेतली असल्याचे सांगितले.