लॉकडाऊन यशस्वी करणाऱया पोलिसांना अद्याप पगार नाही
प्रतिनिधी/ रत्नागिरी
सध्या कोरोनाविरूद्धच्या युद्धात रस्त्यावरची लढाई पोलीस लढत आहेत, मात्र जवळपास अर्धा एप्रिल संपत आला तरी पोलिसांचे पगार अद्याप झालेले नाहीत. सरकारनं मार्च महिन्याचा पगार दोन टप्यांत देण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे सरकारने पोलीस व आरोग्य कर्मचाऱयांचे पूर्ण पगार करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र शासन निर्णयात त्याचा उल्लेख नसल्यानं पोलिसांच्या पगाराबाबतच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
रत्नागिरी जिह्यात जवळपास 1500 पोलीस आहेत. या पोलीस कर्मचाऱयांचे पगार न झाल्याने या महिन्याचं बजेट कसं सांभाळायचं. कारण 10 तारीख उलटून चाललीय मात्र पोलिसांच्या पगाराचं नाव नाही. मिळणारा पगारही पूर्ण मिळेल का, याची शाश्वती नाही. त्यामुळे या 24 तास ताटकळत राहणाऱया पोलिसांना अधिक पगार मिळण्याऐवजी आहे तो पगारही वेळेत न मिळाल्याने पोलिसांमध्ये संभ्रमावस्था आहे. संपूर्ण देशात 20 दिवसांपूर्वी लॉकडाऊन सुरू झाले. त्याच्या आधी देशात कर्फ्यु जाहीर झाला होता. त्या दिवसापासून देशातीलच नव्हे तर राज्यभरातील पोलीस चांगलेच कामाला लागले आहेत.
मुळातच रत्नागिरी जिल्हय़ात पोलीस संख्याबळ कमी असताना आता 10 तारीख उलटून गेली तरी पगार नाही. लॉकडाऊन असताना अनावश्यकपणे बाहेर पडणाऱया नागरिकांना माघारी पाठवण्यासाठी पोलिसांची अक्षरश: दमछाक होत आहे. दिवस-रात्र रस्त्यावर येणाऱया जाणाऱया गाडय़ांची चौकशी करणे, कारवाई करणे यातच पोलिसांचे दिवस जात आहेत. येणाऱया कोणत्याही व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत की नाही, याचा विचार न करता शेकडो लोकांना समोर जाण्याचे काम पोलीस कर्मचारी करत आहेत.
दरम्यान राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीत आर्थिक संकटदेखील समोर उभं ठाकल्याने सरकारने पगार कपात करुन टप्प्याटप्प्यानं देण्याचं सांगितलं आहे. मात्र आरोग्य कर्मचारी व पोलीस कर्मचारी जे लोक कोरोनाची दोन हात करण्यासाठी प्रत्यक्ष या लढाईत मैदानात उभे आहेत. त्यांचा पगार कपात करणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मात्र तरीही पोलीस कर्मचाऱयांचा पगार झालेला नाही. यामुळे अनेक पोलीस कर्मचारी आर्थिक विवंचनेत आहेत.
रत्नागिरी जिल्हय़ात जवळपास सर्वच पोलीस कर्मचारी व अधिकारी कोरोना लढाईच्या बंदोबस्तात आहेत. सिव्हील असेल, कोरोनाबाधित क्षेत्र आणि रत्नागिरी महामार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजातील शांतता व सुव्यवस्थेला धोका निर्माण होवू नये, यासाठी पोलीस 24 तास अलर्ट आहेत. पोलीसही माणूसच आहे. त्यामुळे त्याला कोरोनाचा धोका नाही का, तरीही डॉक्टरांसारखेच पोलीस धोका पत्करून काम करत आहेत. मग अत्यावश्यक सेवा बजावणाऱया पोलिसांना आहे तो पगार वेळेत मिळणे अपेक्षित होते. या बाबत सरकाराने गांभिर्याने विचार केला पाहिजे, अशा प्रतिक्रिया पोलीस कुटुंबियांकडून व्यक्त केली जात आहे.
पोलीस आर्थिक विवंचनेत
रत्नागिरी शहरातील पोलीस मुख्यालय पोलीस वसाहतीचे नूतनीकरण होणार म्हणून शेकडो पोलिसांना वसाहत सोडली आणि आज अनेकजण भाडय़ाने तर काहींनी प्लॅट घेतले आहेत. या प्लॅटचा बँकेचा हप्ता असेल वा भाडे असेल, यासाठी आता पोलिसांना अडचणी निर्माण होत आहेत. एकीकडे पोलिसांच्या कामगिरीचे जाहीर कौतुक करणाऱया सरकाराला त्यांना वेळेत पगार देणे शक्य नाही का, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.