कोरोना विरुद्धची लढाई आता निर्णायक वळणावर आली आहे. कोरोना प्रतिबंधासाठी तयार करण्यात आलेली कोविशिल्ड लस आणि मिशन व्हॅक्सिन यांनी यशाची चढती कमान पादाक्रांत करत नवा इतिहास रचायला प्रारंभ केला आहे. तिसरी व अंतिम चाचणी पूर्ण होऊन फेब्रुवारीत ही लस सर्व भारतीयांना उपलब्ध होईल आणि कोरोना विरुद्धची लढाई जिंकण्यात भारताला यश मिळेल जोडीला कोविड विरुद्धच्या लढय़ात भारताचे योगदान अधोरेखित होईल. एका अर्थाने हिंदुस्थानचा तिरंगा उंचावेल आणि पुण्याचा-महाराष्ट्राचा, भारताचा गौरव होईल. या निमित्ताने सिरम संस्थेचे प्रमुख अदर पुनावाला, त्यांचे सर्व सहकारी, शास्त्रज्ञ यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. कोरोनाने अवघे विश्व वेठीस धरले आहे. जगभरात या महामारीच्या लाटा-त्सुनामी सुरू आहेत. सुमारे सव्वा सहा कोटी लोकांना कोरोनाची बाधा झाली आणि साडे चौदा लाख लोक मरण पावले अशी आकडेवारी दिसते. 2020 हे पूर्ण वर्ष या कोरोना साथीने ग्रासले आणि अजूनही या कोरोनाचे तडाखे पुढील सहा महिने बसतील अशी चिन्हे आहेत. त्यामुळे कोरोनाला अवघे विश्व वैतागले आणि त्यातून सुटका व्हावी, कोरोनावर परिणामकारक इलाज निघावा म्हणून प्रयत्न करत होते. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे, अहमदाबाद आणि हैद्राबाद असा दौरा केला. लस निर्मितीचा आढावा घेतला आणि लस निर्मात्या कंपन्या, चालक व कर्मचारी यांची पाठ थोपटली. कोविशिल्डच्या या आनंदवार्तेने अवघे विश्व आनंदले आहे. सिरमचा आणि झायडस व भारत बायोटेकचा गौरव होतो आहे. कोरोनामुक्तीचा मार्ग दृष्टीक्षेपात आल्याने अवघ्या विश्वात आनंदी आनंद आहे. डॉ. सायरस पुनावाला यांना ‘किंग ऑफ व्हॅक्सिन’ म्हणून ओळखले जाते. शर्यतीची घोडी आणि शर्यती यासाठी त्यांचे पूर्वज काम करायचे व ही घोडी नंतर लस तयार करण्यासाठी विकली जायची. आपणच लसनिर्मिती का करू नये यातून सिरमचा जन्म झाला व आता ही कंपनी जगातील लस निर्मिती करणारी अव्वल कंपनी आहे. कावीळ, पोलिओ, गलगंड, हिपेटायटीस आदी आजारांना प्रतिबंध करण्याच्या अनेक लसी सिरमने विकसित केल्या व जगभर पुरवल्या आहेत. फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत पहिल्या दहा जणात सिरमच्या डॉ. सायरस पुनावाला यांचा समावेश आहे. हाफकीन ही सरकारी संस्था मागे पडून सिरम कशी वाढली आणि पुनावाला व शरद पवार यांची वर्गमैत्री व शेवटच्या बाकावरील विद्यार्थी जीवन सोशल मीडियावर व्हायरल होत असल्या तरी सिरमने केलेली कामगिरी आणि मिळवलेले यश, उंचवलेला तिरंगा झेंडा सर्वांसाठी आनंददायी आणि अभिमानास्पद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही संस्थांची भेट घेऊन घेतलेला आढावा आणि दिलेली शाबासकी सर्वांना बळ देणारी आहे. या लढाईतला शाबासकीचा हा डोसही बुस्टर डोस ठरणार आहे. कोरोना प्रतिबंधासाठी सुरु असलेल्या लसनिर्मितीत कोविशिल्ड अग्रेसर आहे. या लसीचे सर्वात प्रथम भारतात वितरण होणार आहे. लसीची किंमत अद्याप ठरलेली नाही पण सर्वसामान्यांना ती परवडेल अशी वाजवी किंमत आकारुन ती सहज उपलब्ध करुन देण्याची योजना आखण्यात आली आहे. देशभर या लसीच्या वितरणाची व्यवस्थाही लावली जाणार आहे. जुलैपर्यंत 40 कोटी डोस उपलब्ध होतील असे नियोजन आहे. भारतापाठोपाठ आफ्रिका, युके, युरोपमध्ये लस पाठवली जाईल. सध्या पाच कोटी डोस निर्मितीची सिरमची क्षमता आहे. ती जानेवारीपासून दुप्पट केली जाणार आहे. एकूणच कोरोना विरुद्धची लढाई निर्णायक वळणावर आली आहे. या लसीनंतर कोरोनासाठी रुग्णालयात दाखल होण्याची वेळ कोणावर येणार नाही असे सांगितले जाते आहे. कोरोना साथीने थैमान घालायला सुरुवात केली तेव्हा मुंबई-पुणे ही शहरे अधिक चर्चेत आली. धारावी आणि पुणे यावर अनेक जणांनी टीकाटिप्पणी केली. सोशल मीडियात त्यावर चर्चा झाली पण नंतरच्या काळात कोरोनाविरुद्धच्या लढाईत धारावी पॅटर्न आणि कोरोना लस उत्पादनात पुणे हडपसरची सिरम संस्था यांनी चमकदार कामगिरी करुन नावलौकिक मिळवला. लस तिसऱया व अंतिम टप्प्यात आहे. चाचण्या यशाचे बावटे दाखवत आहेत. आता तिसरी चाचणी आणि बालकांवर होणारे लसीचे परिणाम याची निरीक्षणे समोर येतील आणि प्रत्यक्ष लसीकरण सुरू होईल. लस अवघ्या विश्वात देण्याची आहे. गरीब, मागास, विकसनशील देशांना पुरवायची आहे. त्यामुळे त्यामध्ये मोठे आव्हान आहे. अमेरिका, रशिया, चीन यांनीही लसीसंदर्भात संशोधन व निर्मिती केली आहे. अर्थात अवघ्या मानव समूहाच्या कल्याण, आरोग्य व जगण्या-मरण्याचा हा प्रश्न आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने यात लक्ष घातले आहे. सर्वांपर्यंत लस पोचेल आणि ती परिणामकारक असेल यासाठी जागतिक आरोग्य संघटना पावले टाकत आहे. चीन, अमेरिका शीत युद्ध अशी अवस्था आहे. भारताचेही चीनशी चांगले संबंध नाहीत, अमेरिकेत सत्ताबदल झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेवर अमेरिकेने टीकेचा भडिमार केला आहे. पण अशा संकट समयी अवघ्या विश्वाने कोरोनाची लढाई जिद्दीने, ताकदीने व एकत्र लढली पाहिजे तशी ती लढली जाईल हे वेगळे सांगायला नको, तुर्त कोविशिल्ड निर्मिती अंतिम टप्प्यात आहे. पंतप्रधान मोदींनी सिरम पुनावाला आणि लस निर्मितीसाठी काम करणाऱया सर्वांना कौतुकाचा बुस्टर डोस दिला आहे. कोरोनामुक्त भारत, कोरोनामुक्त विश्व यासाठी पुढील सहा महिने काम करावे लागणार आहे. कोरोनाविरुद्धची लढाई निर्णायक वळणावर व अंतिम टप्प्यात आली आहे. पुन्हा एकदा मानव, त्यांची बुद्धी, संशोधन व कष्ट यामुळे मानवी जीवन समृद्ध होणार आहे.
Previous Articleशंकर आणि पार्वती
Next Article दिव्यांच्या प्रकाशाने उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिर
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.