ऑनलाईन टीम / नगर :
कोरोनासंदर्भात उपाययोजना राबविण्यात राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. राज्यात कोरोनासंदर्भातील उपाययोजना अंमलबजावणीचा पुरता बोऱ्या उडाला आहे. हलगर्जीपणामुळे जनतेचा नाहक बळी जात असल्याचे टीकास्त्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकावर सोडले आहे.
जिल्हा दौऱ्यावर आलेल्या विरोधी पक्षनेते दरेकर यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना परिस्थिती व निसर्ग चक्रीवादळ नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर दुपारी शासकिय विश्रामगृह येथे दरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरेकर म्हणाले, कोरोनासंदर्भातील उणिवा आणि वास्तव मांडले, की महाविकास आघाडीकडून आमच्यावर राजकारण करीत असल्याचा आरोप केला जातो. मात्र, अशा आरोपाची पर्वा न करता जनतेसमोर वास्तव मांडत राहू. केरळसारखे राज्य कोरोनावर मात करण्यात यशस्वी ठरू शकते, मग महाराष्ट्राला काय अडचणी येतात, असा प्रश्न उपस्थित करीत ते म्हणाले, नेहमी केंद्र सरकारच्या नावाने खडे फोडायची राज्य सरकारला सवय लागली आहे. कोणत्याही बाबतीत विरोधी पक्षाला विश्वासात घेतले जात नाही. महाविकास आघाडीचे हे सरकार गोंधळलेले आहे. सरकारमधील सारे कधी एकत्र येणार अन् जनतेच्या हिताचे निर्णय कधी घेणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच मुंबई-पुणे सारख्या ठिकाणी खाटा, व्हेंटिलेटर आदी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचा जीव जात असल्याचे त्यांनी सांगितले.
निसर्ग चक्रीवादळासंदर्भात ते म्हणाले, या चक्रीवादळाचा राज्याला मोठा फटका बसला. वादळाच्या तडाख्याने नुकसान झाले, त्याची शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळावी, यासाठी सरसकट मदतची मागणी सरकारकडे लावून धरली जाईल.