ऑनलाइन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोना आपल्या मागे लागला आहे. मात्र, कोरोना च्या मागे आपण हात धुवून लागलो आहोत असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा जनतेला घरी रहा आणि सुरक्षित रहा असे आवाहन केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्ह द्वारे जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
उध्दव ठाकरे म्हणाले, याचबरोबर आता राज्यभरात फिव्हर क्लिनिक्स सुरू केली जाणार आहे. ज्यांना सर्दी, ताप, खोकला ही लक्षणे असतील त्यांनी इतर ठिकाणी जाऊ नका. या फिव्हर क्लिनिक मध्येच जा. ही कुठे असतील, काय असतील याची सूचना आपल्याला दिली जातील. प्रत्येक विभागात ही क्लिनिक सुरू करण्याची सूचना मी दिलेली आहे. असं ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मला पण कल्पना आहे घरी बसून राहण्याचा सर्वांना कंटाळा आला आहे. पण सध्या आपल्याकडे काही इलाज नाही आहे. मी वृत्तवाहिन्यांना विनंती करतो बातमी देतच राहा, बरोबर आपली जनता घरी राहून तणावमुक्त कशी राहील, आनंदी कशी राहिल असे कार्यक्रम आपल्या वाहिनीच्या माध्यमातून घरोघरी न्या.
पुढे ते म्हणाले, जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी कोणी घराबाहेर पडत असेल तर कंपल्सरी मास्क वापरा. मास्क मिळत नसेल तर साधा स्वच्छ रुमाल तोंडाला बांधा आणि मगच घराबाहेर पडा तसेच एकाचा मास्क दुसऱ्याने वापरू नये असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.
ते म्हणाले, महाराष्ट्रात आत्तापर्यंत 21 हजार जणांना विलगीकरणात ठेवले आहे. पंधरा ते सतरा हजार चाचण्या झाल्या आहेत. राज्यांची लक्षणे सौम्य आहेत असे 610 जण आहेत. त्यापैकी 22 जण गंभीर आहेत. विषाणू चा हा गुणाकाराचा काळ असल्याने पुण्या-मुंबईतील चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत असं ही ते म्हणाले.