देशाच्या 23 राज्यांमधील 45 जिह्यांमध्ये मागच्या दोन आठवडय़ात जिथे कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही, अशा जिह्यांचा बिगर हॉटस्पॉट श्रेणीत (नारंगी) समावेश केला जातो. पुढल्या 14 दिवसांमध्येही नवा रुग्ण न आढळल्यास, हे जिल्हे कोरोनामुक्त मानले जातील. कोरोनाच्या वातावरणातील ही एक दिलासादायक बातमीच म्हणावी लागेल. कोरोनाशी लढणाऱया परिचारिका, डॉक्टर्स आणि पोलीस यांचे ठिकठिकाणी फुले उधळून कौतुक केले जात आहे. महाराष्ट्रात एका ठिकाणी तर, एक पोलीस अधिकारी दिवसभर सतत बाहेर फिरत असल्यामुळे सावध झाला आणि त्याने आपल्या घरासमोरच्याच इमारतीत स्वतंत्रपणे काही दिवस राहण्याचा निर्णय घेतला. कामावर येत जात असताना, त्याची चिमुरडी मुलगी त्याला खिडकीतूनच बाय बाय करत होती आणि त्याच्या आठवणीने रडतही होती. अशी असंख्य उदाहरणे. बेळगावमध्ये तर कोरोनामुळे ताटातूट झालेल्या मायलेकींची तब्बल 21 दिवसांनी भेट झाली. परिचारिकेची सेवा बजावणाऱया मातेला कोरोनामुळे तीन आठवडे आपल्या तीन वर्षांच्या चिमुकलीला भेटता आले नव्हते. भेट झाल्यानंतर दोघींनाही अश्रू अनावर झाले. पण आज आवर्जून सांगावेसे वाटते ते कोरोनाशी लढणाऱया ओडिशामधील महिलांबद्दल. ओडिशामध्ये देशात सगळय़ात आधी, म्हणजे 12 मार्चला राजधानी भुवनेश्वरात आणि 24 मार्चपासून संपूर्ण राज्यात लॉकडाऊन जाहीर झाला. देशव्यापी लॉकडाऊन 25 मार्चपासून जाहीर झाला होता, हे लक्षात घ्यावे. लॉकडाऊनची मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय ओडिशाने सर्वात आधी घेतला. राष्ट्रव्यापी लॉकडाउन 3 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय नंतर झाला. ओडिशाचे कार्यक्षम मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी भिलवाराचे कंटेन्मेंट मॉडेल ओडिशात कठोरपणे राबवले. ओडिशातील आशा, अंगणवाडी आणि स्वयं सहायता गटातील महिला कार्यकर्त्या करोनाविरुद्दच्या लढाईत झोकून देऊन काम करत आहेत. 605 स्वयं सहायता गटांनी 15 लाख कॉटन मास्क बनवलेले आहेत. सात हजार महिला गटांतील कार्यकर्त्या दिवसरात्र मेहनत करून प्रोटेक्शन गियरचे उत्पादन करत आहेत. राज्यातील पाच हजारहून ग्रामपंचायतींमधील मोफत आहार केंद्रांचं व्यवस्थापन, ‘मिशन शक्ती’मधील जवळपास सात हजार महिला करत आहेत. तीन-चार लाख लोकांना भोजन देण्याचे काम त्या करत आहेत. हजारो परिचारिका, सुईणी, आशा व अंगणवाडी कार्यकर्त्या घरोघरी जाऊन आरोग्य चाचणी घेत आहेत. भुवनेश्वरमध्ये कोव्हिड-19 टेस्टिंग सेंटर असून, त्याचे नेतृत्व संघमित्रा पती या महिला शास्त्रज्ञ करत आहेत. त्यांना ज्योतिर्मयी तुरुप या दुसऱया शास्त्रज्ञ स्त्रीचे सहकार्य लाभले आहे. राज्यात आक्रमकपणे टेस्टिंग करण्याचे काम त्यांच्यातर्फे केले जात आहे. भुवनेश्वर व कटकमधील प्रमुख वैद्यकीय महाविद्यालयांचे रूपांतर टेस्टिंग सेंटरमध्ये करण्यात आले असून, त्याचे नेतृत्वही स्त्रियांकडेच आहे. राज्यातल्या शंभर महिला स्वयंसहायता गटांनी मुख्यमंत्री मदत निधीला 11 लाखांची देणगी दिली आहे. ओडिशा स्टेट मेडिकल कॉर्पोरेशनच्या संचालक यामिनी सारंग या असून, औषधे व वैद्यकीय सामग्रीचा त्वरेने पुरवठा करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन घोषित केली आहेत. ओडिशातील जे मजूर अन्य प्रांतात अडकून पडले आहेत, त्यांचा शोध घेणे, त्यांची विचारपूस करून त्यांना हवं नको ते बघणे हे काम राज्याच्या कामगार सचिव अनू गर्ग अत्यंत चिकाटीने करत आहेत. काँटॅक्ट टेसिंग, नमुन्यांचे संकलन आणि टेस्टिंगच्या कामावर आरोग्य मिशनच्या संचालिका शालिनी पंडित देखरेख करत आहेत. कोव्हिड-19 बाबत राज्यभर जागरूकता निर्माण करण्याचे काम गजपती जिह्याच्या पोलीस अधीक्षक सारा शर्मा करत असून, या जिह्यात कोव्हिडची एकही केस आढळलेली नाही. विशेष म्हणजे, कोरोनाबाबत जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी सारा या संगीताच्या माध्यमाचा प्रभावी उपयोग करत आहेत. कटकमधील सोफिया फिरदौस या दानशूर बाई दोन हजार स्थलांतरित बांधकाम मजुरांना रोजच्या रोज खाद्य वस्तू, शिधा तसेच मास्क व सॅनिटायझरही पुरवत आहेत. स्त्रियांमध्ये मुळातच अधिक संवेदनशीलता असते आणि काळजी घेण्याची वृत्ती. या गुणांचा उपयोग करून घेण्याची हातोटी ओडिशात विशेषत्वाने दिसून येत आहे, हे नाकारता येणार नाही. तर बेंगलोरमध्ये महिता नागराज यांनी ‘केअर माँगर्स इंडिया’ हा उपक्रम सुरू केला असून, त्या अंतर्गत ज्ये÷ नागरिकांना औषधे व वाणसामान पुरवण्यात येत आहे. मुंबईतही वांदे इथे अनिता हिराणी या उपाशी व्यक्तींना मोफत जेवण पुरवत आहेत.
पुण्यातील मीनल दाखवे-भोसले यांचे मला विशेष कौतुक वाटते. माय लॅब्जच्या त्या मुख्य संशोधन अधिकारी आहेत. कोरोनाचे देशातील पहिले टेस्टिंग किट त्यांनी बनवले आहे, तर केरळमधील आरोग्यमंत्री के के शैलजा या सध्या तिथल्या यशस्वी कोरोना लढय़ात अत्यंत सक्रिय आहेत. त्या मुळात रसायन शास्त्राच्या शिक्षका असून, टीचर अम्मा या नावाने ओळखल्या जातात. या आधी निपाह विषाणूवर मात करण्यातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. महिंद्र आणि महिंद्र लि.चे अध्यक्ष आनंद महिंद्र हे सामाजिक भान असलेले उद्योगपती म्हणून आपल्याला माहीत आहेत. त्यांनी आपला पगार गोरगरिबांसाठी दिला आहे. महिंद्र समूहाने व्हेंटिलेटर उत्पादनाचीही तयारी सुरू केली आहे. महिलांच्या सामाजिक उपक्रमांसाठीही आनंद महिंद्र नेहमीच मदत करायला तत्पर असतात, म्हणून त्यांचा इथे उल्लेख केला एवढेच. उद्योजिका देविता सराफ यांनीही कोरोनाग्रस्तांसाठी अर्थसाह्य तर दिलेले आहेच. पण मुंबईतील शोषित-वंचितांकरिता अन्न व औषधांची पॅकेट्सही त्या पुरवत आहेत.
भारतातच नव्हे, तर परदेशातही अनेक महिला कोरोनाशी झुंज देत आहेत. जर्मनीच्या पंतप्रधान अँजेला मर्केल या स्वतः वैज्ञानिक असून, त्यांनी जर्मनीला या संकटातून मुक्त करण्याच्या दिशेने चांगलेच प्रयत्न केले आहेत. ख्रिस्तिन लगार्ड या काही महिन्यांपूर्वीपर्यंत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक होत्या. सध्या त्या युरोपीय मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षा असून, कोरोनाचा मुकाबला सामूहिकपणे करण्याबाबत त्या युरोपला दिशादिग्दर्शन करत आहेत. मात्र देशाचे व आंतरराष्ट्रीय संस्थांचे नेतृत्व करणाऱया महिलांची उदाहरणे आपण बघितली. परंतु अन्य स्तरांवर काम करणाऱया स्त्रियांची उदाहरणंही बघण्यासारखी आहेत. इराणमधील शोहादा हॉस्पिटलमधील फिजिय़यिन शीरीन रोहानी यांना स्वतःला करना झाला होता. त्यात त्यांचा मृत्यूही झाला. परंतु करोना पॉझिटिव्ह म्हणून सिद्ध होण्यापूर्वी त्या शेवटपर्यंत न थकता रुग्णांची सेवा करत होत्या. दुबईमधील अल ऐन विद्यापीठात टेलिफोन ऑपरेटर म्हणून निवृत्त झालेले अब्दुल खादिर यांचे उदाहरणही बघण्यासारखे आहे. केरळमधून दुबईत आलेल्या 131 स्थलांतरित मजुरांसाठी अब्दुलजी रोज 8 हजार रु. खर्च करत आहेत. त्यांनी या मजुरांना दहा मोठय़ा खोल्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून ठेवले आहे. तिथे पंखे, टेलिव्हिजन या सुविधा आहेत व दिवसातून दोनदा त्यांना जेवण दिले जाते.
सामान्य स्तरावरूनही माणुसकीचे व दातृत्वाचे अथांग दर्शन होत असते. लातूरचा भूकंप असो, मुंबईतला महापूर वा आताचे हे कोरोनाचे जागतिक संकट. संकटाच्या वेळी जी मदतीला धावून येतात, तीच खरी मोठी माणसं…नुसते लेख लिहिणे वा भाषणे ठोकणे किंवा समाजमाध्यमातून जहर ओकणे यापेक्षा अशी माणसे व त्यांचे काम यांचे अधिक मोल आहे. या माणसांबद्दल आपण कृतज्ञ राहायला हवे.
नंदिनी आत्मसिद्ध