राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सत्ताधारी आणि विरोधक राजकीय आरोप प्रत्यारोप करण्यात मग्न आहेत. वाढत्या कोरोनावर मात करण्यासाठी आणि जनजीवन पूर्वपदावर आणून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी किमान काही वेळ तरी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे. धारावीत कोरोनावर नियंत्रण मिळविण्याठी ज्याप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेतल्याचे बोलले जात आहे, तसेच आता राज्यातही सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.
देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मृतांच्या संख्येनेही 10 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. एकीकडे ही भीषण परिस्थिती असताना दुसरीकडे राज्यातील राजकारण थांबत नाही. म्हणजेच आता एक वेळ कोरोना थांबेल मात्र महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यातील राजकारण थांबेल याची शक्यता कमीच आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी ठिकठिकाणी जाऊन राज्य सरकारवर कठोर शब्दात टीका केली. सध्या भाजपमध्ये असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. शिवसेना विरुद्ध भाजप असाच संघर्ष जोरात पहायला मिळत आहे. त्यात अधुनमधुन राष्ट्रवादी शिवसेनाच्या बाजूने दिसत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत मात्र चांगला समन्वय असल्याने हे दोन्ही पक्ष मिळून भाजपचा सामना करत असताना काँग्रेस मात्र यात म्हणावी तशी दिसत नाही. एकीकडे राज्य सरकारने अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार नसल्याचे पूर्वीच जाहीर केले होते. मात्र गेल्याच आठवडय़ात युजीसीने राज्य सरकारला कोणत्याही परीस्थितीत सप्टेंबरअखेर परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे एकीकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये समन्वय नसल्याचे बघायला मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाहक संभ्रमावस्था आहे. आज या परीक्षांवर काय तो अंतिम तोडगा निघण्याची शक्यता असून हा तोडगा काढून किमान विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची की नाही ते एकदाचे सांगून टाका म्हणजे विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल.
दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या पोलीस उपायुक्तांच्या बदल्या मुख्यमंत्र्यांनी रद्द केल्या. त्यावरून महाविकास आघाडी सरकारमध्येही समन्वय नसल्याचे दिसून आले. गेल्या 15 दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईपेक्षाही अधिक एमएमआर रीजन म्हणजेच नवी मुंबई, ठाणे तसेच पुण्यात वाढत आहे. पुण्यात रोज 800 ते 850 च्या घरात नवीन रुग्ण आढळत आहेत. ठाणे, नवी मुंबईतही अशीच अवस्था आहे. मात्र आजही जनतेला कोरोनासाठी म्हणावी तशी आश्वासक व्यवस्था उभारण्यात आलेली नाही. ठाण्यात एका व्यक्तीचा मृतदेह दुसऱयाला दिला जातो आणि त्याचे अंत्यसंस्कारपण केले जातात त्यामुळे आता जनताच संभ्रमात आहे. कोरोनावर जोपर्यंत लस किंवा उपचार मिळत नाही तोपर्यंत जनतेलाच स्वत:च स्वत:ची काळजी घेण्याची गरजेचे आहे. कारण सरकार म्हणून जी एक यंत्रणा असते ती आज तरी किमान मुंबई, ठाण्यात म्हणावी तशी प्रभावी ठरलेली नाही. म्हणून आज सामान्य नागरिकही पैसा गेला तरी चालेल मात्र खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यात त्यांच्याकडून लाखो रु.ची लूट केली जात असताना सरकारचा कोणताही वचक असल्याचे दिसून येत नाही. गेले 4 महिने लॉकडाऊन असल्याने अनेक लोकांच्या नोकऱया गेल्या आहेत. आहे त्या नोकऱयांची शाश्वती नाही, खालील यंत्रणा सरकारच्या आदेशाला जुमानत नाही. रोज राज्यात 7 ते 8 हजार बाधित रुग्ण मिळत असताना सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकत्र येत संपूर्ण राज्य धारावीप्रमाणे कोरोनामुक्त करण्याची गरज आहे. मात्र राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात एकीकडे रोज आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. तर दुसरीकडे सरकारमधील शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्येदेखील समन्वय नसल्याचे दिसत आहे. नगरमधील शिवसेनेचे 5 नगरसेवक राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांना परत काहीच तासात शिवसेनेत पाठविण्यात आले. तर पोलीस अधिकाऱयांच्या बदल्यावरूनही राजकारण चांगलेच तापले होते. अखेर शरद पवारांना मातोश्रीवर जावे लागले. काँग्रेसला या सरकारच्या निर्णय प्रक्रियेत स्थान दिले जात नसल्याने काँग्रेस नाराज आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण वगळता कोणीही म्हणावे तसे सक्रिय दिसत नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे सरकार हे सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये पडणार असल्याच्या मुद्यावरूनच सत्ताधारी आणि विरोधक राजकारण करत आहेत. सत्ताधारी भाजप ऑक्टोबरमध्ये सरकार पाडणार असल्याचे बोलतात तर विरोधी पक्ष आम्हाला हे सरकार पाडण्यात स्वारस्य नसून हे सरकार अंतर्विरोधाने पडेल असे म्हणत आहेत. तर शरद पवार हे सरकार 5 वर्ष चालणार असल्याचे सांगत आहेत. काँग्रेसचे सरकार असलेल्या मध्य प्रदेशमध्ये सत्तांतर झाल्यानंतर आता राजस्थानमध्ये ऑपरेशन लोटसचा प्रयोग सुरू असून मध्यप्रदेशमध्ये अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वादामुळे येथील काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. या राज्यात ऑपरेशन लोटस यशस्वी झाल्यास पुढील प्रयोग महाराष्ट्रातही होऊ शकतो. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणातही उलथा पालथ होऊ शकते. असे असले तरी सध्या सर्वसामान्यांना कोरोना विरोधात राजकीय एकजूट हवी आहे. दहशत निर्माण केलेल्या कोरोनापासून सर्वांनाच आता दिलासादायक उपाययोजना हव्या आहेत.
प्रवीण काळे