नव्या कोरोनाला घाबरण्याचे कारण नाही : संशोधकांचे प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशव्यापी लसीकरणाच्या सज्जतेची चाचपणी करण्यासाठी हाती घेण्यात आलेली लसीकरणाची रंगीत तालीम यशस्वी झाली आहे. चार राज्यांमध्ये दोन दिवस ती घेण्यात आली. आंध्र प्रदेश, पंजाब, गुजरात आणि आसाम या राज्यांचा या रंगीत तालमीत समावेश होता. सरकार लसीकरण क्रियान्वित करण्यास सज्ज असल्याचे या प्रयोगातून दिसून आले, अशी माहिती देण्यात आली.
सरकारने लोकांच्या सूचना घेण्यासाठी पोर्टल तयार केले आहे. त्यावर देण्यात आलेल्या अनेक सूचना सरकारच्या विचाराधीन आहेत. रंगीत तालमीसाठी विशिष्ट प्रकारे प्रशिक्षित केलेली दले नियुक्त करण्यात आली होती. त्यांच्या तत्परतेची चाचणीही यामध्ये घेण्यात आली. सर्व राज्यांमधून समाधानकारक अहवाल आल्याचे स्पष्ट करण्यात आले. लसीकरण राज्यांच्या सहकार्याने करण्यात येणार आहे.
अनुभव कामी आला
दरवर्षी भारतात कोटय़वधी लोकांचे व नवजात बालकांचे लसीकरण करण्यात येते. केंद्रीय तसेच राज्य आरोग्य विभागांना या कामाचा मोठा अनुभव आहे. साहजिकच या अनुभवाचा उपयोग कोरोना लसीकरणासाठी होणार आहे. हे लसीकरण जानेवारीच्या प्रथम सप्ताहापासून सुरू होण्याची शक्यता आहे.
ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांची तपासणी
नव्या स्वरूपातील कोरोनाचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारने जोरदार मोहीम उघडली असून विदेशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी कसोशीने करण्यात येत आहे. ब्रिटनहून येणाऱया विमानांवर बंदी घालण्यापूर्वी त्या देशातून आलेल्या प्रवाशांचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या केल्या जात आहेत. आतापर्यंत ब्रिटनहून आलेल्या 31 रूग्णांना नवा कोरोना झाल्याचे दिसून आले असून त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या 31 पैकी 10 मंगळवारी सापडले.
या रूग्णांच्या संपर्कात आलेल्यांचाही शोध घेतला जात असून आतापर्यंत दीडशेहून अधिक जणांच्या चाचण्या झाल्या आहेत. आतापर्यंत ब्रिटनहून 13 हजार प्रवासी भारतात आले असून त्यांच्यापैकी 1400 हून अधिक दिल्लीचे रहिवासी आहेत. नागरी विमानवाहतूक कक्षाने या सर्व प्रवाशांची सूची प्रसिद्ध केली असून त्यांच्याशी संपर्क केला जात असल्याची माहिती देण्यात आली. डिसेंबर 9 ते डिसेंबर 22 पर्यंत भारतात आलेल्या सर्व कोरानाबाधित विमान प्रवाशांच्या जनुकांचे संग्रहण करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
उपचाराधीनांची संख्या नीचांकी पातळीवर
देशात सोमवार संध्याकाळ ते मंगळवार संध्याकाळ या 24 तासांच्या काळात 16 हजार 449 नवे कोरोना रूग्ण आढळले. याच कालावधीत बरे झालेल्यांची संख्या 20 हजार 347 होती. यामुळे उपचाराधीन रूग्णांच्या संख्येत आणखी घट झाली असून ती आता 2 लाख 68 हजार 117 पर्यंत खाली आली आहे. हा गेल्या 188 दिवसांमधील नीचांक आहे. याच 24 तासांमध्ये 257 जण मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे मृतांची एंकंदर संख्या 1 लाख 48 हजारांच्या जवळपास पोहचली आहे. देशभरात कोरोना मृत्यूदर 1.43 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
नव्या कोरोनाला घाबरू नका
कोणताही विषाणू सातत्याने त्याचे जनुकीय स्वरूप पालटत असतो. तशीच सवय कोरोना विषाणूलाही आहे. त्याची अनेक नवी रूपे आढळून आली आहेत. मात्र ती धोकादायक नसून त्यांना घाबरण्याचे कारण नाही. केवळ स्वच्छतेचे सर्वसाधारण नियम आणि इतर दक्षता घेत रहावे. शारिरीक अंतराचा नियम कसोशीने पाळल्यास भीती बाळगण्याचे कारण नाही, मास्कचा उपयोग आवर्जून केला पाहिजे, असा दिलासा देशातील मान्यवर संशोधक व शास्त्रज्ञांनी लोकांना दिला आहे.
अधिक प्रसार पण…
नव्या कोरोना विषाणूंचा प्रसार अधिक प्रमाणात होतो. तथापि, त्याची तीव्रता आणि धोका पोहचविण्याची क्षमता कमी असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्याचा बहुतेकांना विशेष त्रास होणार नाही. मात्र, नियमांचे पालन करून सावध राहण्याची आवश्यकता आहे, असे जगभरातील अनेक तज्ञांनी स्पष्ट केले आहे.
शांताकुमार यांच्या पत्नीचा मृत्यू
हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शांताकुमार यांच्या पत्नी संतोष शैलजा यांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर राज्याच्या कांगडा जिल्हय़ातील राजेंद्र प्रसाद वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाबद्दल भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दुःख व्यक्त केले आहे.