आरोग्य खात्याचा दावा संचारबंदीतही लसीकरण
प्रतिनिधी / पणजी
गोव्यात दोन्ही कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचा दावा राज्य सरकारतर्फे करण्यात आला असून एक डोस घेतलेल्या 5 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली आहे.
आरोग्य खात्याचे सचिव रवी धवन, संचालक ज्योस डिसा व गोमेकॉचे डिन शिवानंद बांदेकर यांनी पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली.
त्यांनी पुढे सांगितले की 45 वर्षावरील लोकांसाठी आतापर्यंत 3.85 लाख डोस देण्यात आले असून 2.40 लाख लोक शिल्लक राहिले आहेत. ते देण्याची प्रक्रिया विविध आरोग्य केंद्रातून चालू असून संचारबंदीच्या काळातही ते डोस देण्याचे काम चालू रहाणार आहे.
कोरोना रुग्णांना जास्तीत जास्त आरोग्य सेवा सवलती, सुविधा देण्याचे सरकारचे प्रयत्न चालू असून सुपर स्पेशालिटी विभागही त्या हेतूनेच सुरू करण्यात आला आहे. गोमेकॉतील रुग्णांना तेथे हलवण्यात येत असून ऑक्सिजनसह व्हेंटिलेटरची सोय येथे करण्यात आली आहे.
विविध ठिकाणी कोविड केअर सेंटर्स सुरू करण्यात येत असून त्यांची तयारी नेटाने चालू आहे. लक्षणे नसलेल्या परंतु पॉझिटीव्ह झालेल्या कोरोना रुग्णांना सेंटरमध्ये भरती करण्यात येणार असून गंभीर रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
लोकांनी लक्षणे दिसताच तपासणी करून घ्यावी आणि वेळ न घालवता उपचार सुरू करावेत. कोरोनाचा अहवाल येईपर्यंत वाट पाहू नये. कोरोनाची दुसरी लाट गंभीर असून लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना रुग्ण तपासणी करण्यास उशीर लावतात, अहवालासाठी थांबतात औषधे सुरू करीत नाहीत आणि मग शेवटी गंभीर हालत झाली की हॉस्पिटलमध्ये येतात. लोकांनी याची दखल घेवून सावधगिरी बाळगावी उशीर करू नये असे आवाहन त्यांनी केले.