प्रतिनिधी / कुरुंदवाड
कोरोना वाढता प्रसार थांबविणे हे आपल्या पुढील फार मोठे आव्हान आहे. यासाठी शासनाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम आखली आहे. ही मोहीम शहरांमध्ये प्रभावीपणे राबविण्यात येणार असून यामध्ये सर्वांनी सहभागी होऊन सामुदायिकपणे कोरोनाविषाणूचे उच्चाटन करणे क्रमप्राप्त झाले आहे. असे प्रतिपादन नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी व्यक्त केले. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसाराचा अटकाव करण्यासाठी कुरुंदवाड नगरपरिषदेने बोलावलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा शुभारंभ प्रसंगी निमंत्रितांच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून नगराध्यक्ष पाटील बोलत होते.
या बैठकीमध्ये मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी या मोहिमेबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी अनेकांनी आपली मते व्यक्त केली. यामध्ये कुरुंदवाड शहरात कोरोनाविषाणूचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. तो रोखणे गरजेचे आहे, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी करणे आवश्यक आहे. यासाठी लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. 60 वर्षावरील व्यक्ती,10 वर्षा खालील मुले, तसेच मधुमेह रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. प्रत्येक नागरिकाचा जीव महत्त्वाचा आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम पुढील दीड महिना चालणार आहे. यासाठी एकूण 10 पथके तयार करण्यात येणार आहेत. प्रत्येक पथकात नगरसेवक शिक्षक नगरपालिका कर्मचारी स्वयंसेवक आदींचा समावेश आहे.
शहरातील कोविड सेंटर करता ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. नगरपालिके मार्फत प्रत्येक नागरिकाला मास्क तसेच प्रत्येक घरटी आंघोळीचा साबण सॅनिटायझर बाटलीचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. अशी मते या बैठकीत अनेकांनी व्यक्त केली या बैठकीत नगरसेवक सुनील चव्हाण उदय डांगे मुख्याधिकारी निखिल जाधव सामाजिक कार्यकर्ते तुकाराम पवार यांनी आपली मते व्यक्त केली.
या बैठकीला नगरसेवक फारुख जामदार दिपक गायकवाड प्रफुल पाटील, जावेद बागवान, तानाजी आलासे, महादेव बागलकोटे, सदाशिव मगदूम, जयपाल बलवान, विष्णुपंत माळी, उपनगराध्यक्ष मुमताज बागवान, स्नेहल कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.