‘नोमुरा’ सिक्युरिटी रिसर्च कंपनीचा अहवाल : जोखिमयुक्त 15 देशांमध्ये भारत सामील : रुग्ण वाढण्याची भीती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
निर्बंध शिथिल करण्यात आल्याने कोरोना बाधितांचा आकडा वाढण्याची जोखीम असलेल्या 15 देशांमध्ये भारत सामील असल्याचा दावा नोमुरा या सिक्युरिटी रिसर्च कंपनीच्या अहवालात करण्यात आला आहे. या 15 देशांमध्ये कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे.
नोमुराने या संशोधनात 45 अर्थव्यवस्थांना सामील केले होते. तसेच देशांना 3 शेणींमध्ये मांडण्यात आले आहे. ऑन ट्रक, वॉर्निंग साइन, डेंजर झोन अशा या शेणी आहेत. भारताला डेंजर झोनमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
ऑन ट्रक : या शेणीत ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, इटली, ऑस्ट्रिया, जपान, नॉर्वे, स्पेन, थायलंड, ग्रीस, रोमानिया, दक्षिण कोरिया यासारखे 17 देश आहेत. या देशांना हिरव्या रंगासह सुरक्षित ठरविण्यात आले आहे.
वॉर्निंग साइन : या शेणीत डेन्मार्क, फिनंलड, हंगेरी, आयर्लंड, पोलंड, जर्मनी, अमेरिका, ब्रिटन यासारख्या 13 देशांना सामील करण्यात आले आहे.
डेंजर झोन : या शेणीत एकूण 15 देश असून यात भारत, इंडोनेशिया, चिली, पाकिस्तान, ब्राझील, मेक्सिको यांचा समावेश आहे. यात काही उत्तम अर्थव्यवस्था असलेले देश म्हणजेच स्वीडन, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका आणि कॅनडा देखील सामील आहेत.
अहवालानुसार 17 देशांच्या अर्थव्यवस्था ट्रकवर आहेत. या देशांमध्ये विषाणूचा संसर्ग पुन्हा येण्याचे कुठलेच संकेत मिळालेले नाहीत. 13 देशांमध्ये इशाऱयाचे संकेत दिसून आले आहेत. तर 15 देश सर्वाधिक जोखिमीच्या शेणीत आहेत. या देशांमध्ये संसर्गाची दुसरी लाट उद्भवू शकते.
दोन प्रकारची स्थिती
अध्ययनानुसार टाळेबंदी हटविण्यात आल्याने दोन प्रकारची स्थिती निर्माण होणार आहे. पहिल्या स्थितीत देशातील अर्थचक्र गतिमान होण्यासह व्यापार वाढणार असला तरीही प्रतिदिन नव्या बाधितांमध्ये किरकोळ वाढ होईल. तर दुसऱया स्थितीत परिणाम वाईट होऊ शकतात. अर्थव्यवस्था खुली केल्याने प्रतिदिन बाधितांचे प्रमाण वाढून जनतेत भीती पसरल्याने अर्थचक्र पुन्हा मंदावू शकते. तसेच पुन्हा टाळेबंदी लागू करण्याची वेळ येऊ शकते.