सावंतवाडी कुटिर रुग्णालयातील चित्र : एकच व्हेंटिलेटर, डॉक्टर्सही अपुरे
प्रतिनिधी / सावंतवाडी:
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात ‘कोरोना’ रुग्ण उपचारासाठी ठेवण्यास नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव विरोध केला. नगराध्यक्ष संजू परब यांनी
आक्रमक पवित्रा घेतल्याने दोन रुग्णांना उपचारासाठी ओरोस येथे हलविण्यात आले. मात्र, आरोस रुग्णालयात ‘कोरोना’ रुग्ण वाढल्यास सावंतवाडीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करावे लागणार आहेत. येथे ‘कोरोना’ रुग्णांसाठी 20 खाटांचा कक्ष आहे. या ठिकाणी आणखी पंधरा खाटा वाढविण्यासाठी तयारी आहे. मात्र, व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची सुविधा नाही. त्याशिवाय डॉक्टर आणि कर्मचारीही कमी आहेत. त्यामुळे या सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर आणि रुग्णालय मध्यवर्ती ठिकाणी असल्याने आवश्यक खबरदारी घेऊनच रुग्णांना येथे उपचारासाठी ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा कोरोना रुग्ण ठेवल्यास सावंतवाडीकरांच्या आरोग्याला धोका पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आधीच डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. तसेच आवश्यक तंत्रज्ञ नाहीत. त्यामुळे गंभीर रुग्णांना उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलवावे लागत होते. यासंदर्भात वेळोवेळी शासनाचे लक्ष वेधण्यात आले. परंतु आवश्यक कार्यवाही झाली नाही. तरीही प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयाचा आधार लोकांना वाटतो. आता ‘कोरोना’चे संकट आले आहे. त्यामुळे रुग्णालयात ‘कोरोना’ कक्ष तयार करण्यात आला आहे. येथे 20 रुग्णांवर उपचार करण्याची तयारी आहे. आणखी पंधरा रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता आहे. मात्र, येथे ‘कोरोना’चा गंभीर रुग्ण आल्यास एकच व्हेंटिलेटर असल्याने अडचण निर्माण होऊ शकते. ऑक्सिजनची सुविधाही नाही. सध्या नऊ डॉक्टर आहेत. ‘कोरोना’ रुग्णांवर उपचार करायचे झाल्यास आणखी चार डॉक्टर आणि दहा स्टाफची गरज आहे. या सुविधा उपलब्ध झाल्यास उपचारासाठी ‘कोरोना’ रुग्ण ठेवणे शक्य आहे.
उपजिल्हा रुग्णालय शंभर खाटांचे आहे. या ठिकाणी गरोदर महिला प्रसुतीसाठी दाखल होतात. तसेच डायलिसीसीचे रुग्ण असतात. नेहमीचे 40 ते 42 रुग्ण उपचारासाठी दाखल असतात. तसेच सदर रुग्णालय शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. सुविधा न पुरवता ‘कोरोना’ रुग्ण ठेवल्यास नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे येथे कक्ष असूनही ‘कोरोना’ रुग्ण उपचारासाठी ठेवण्यास नागरिकांचा विरोध आहे. प्रशासनानेही याची दखल घेण्याची गरज आहे.