बामणोली बिटात 35 शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप
प्रतिनिधी/ सातारा
बाल रक्षक प्रतिष्ठानने विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. करोना काळात उद्योग, व्यवसाय अडचणीत आलेले असताना बामणोलीसारख्या दुर्गम भागातील 35 शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचा प्रतिष्ठानचा उपक्रम अनुकरणीय आहे, असे गौरवोद्गार जावळी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी अरुणा यादव-भुजबळ यांनी काढले.
बाल रक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत बामणोली बिटातील 35 शाळांना शैक्षणिक साहित्याच्या वितरण प्रसंगी यादव बोलत होत्या. यावेळी ग्राम परिवर्तन संस्था कटगुणचे अध्यक्ष प्रताप गोरे, बामणोली केंद्रप्रमुख विजय देशमुख, अंधारी केंद्रप्रमुख मनुकर, प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
अरुणा यादव म्हणाल्या, जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे शिक्षक झोकून देवून काम करत असल्याने दिवसेंदिवस या शाळांचा पट वाढत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी शिक्षकांनी नेहमीच प्रयत्न केला आहे. अनेक शिक्षक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम करत आहेत. या भागातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी शिक्षक, सामाजिक संस्था मदत करत आहेत. बाल रक्षक प्रतिष्ठानने या भागातील शाळांना केलेली मदत निश्चितच अनुकरणीय आहे.
बामणोली विभाग हा अतिशय दुर्गम व डोंगराळ असून येथील विभागाचे अतिवृष्टीने खूपच नुकसान झाले आहे. आमच्या संस्थेमार्फत येथील एक हजार विद्यार्थ्यांना मोफत मास्क व ग्रामसुरक्षा पुस्तिका प्रदान करण्यात येत असल्याचे प्रदीप गोरे यांनी सांगितले.
यावेळी आदर्श शिक्षक संतोष लोहार, नितीन जाधव, नामदेव जुनघरे, बाबासाहेब थोरात, बाळकृष्ण भंडारे, चेतना चव्हाण, सर्व महिला शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक दीपक भुजबळ यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र इंगवले यांनी केले. आभार मिलन शिंदे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश पडलवार, दीप्ती कदम, अश्विनी गुरव, माधवी शिंगटे, सुनीता कदम, सखाराम मालुसरे, निलेश उतेकर, संतोष कदम, संतोष लोहार, ए.बी. जाधव, ओव्हाळ सर, ज्ञानदा गुरव यांनी परिश्रम घेतले.