प्रतिनिधी / कोल्हापूर
संपूर्ण देशात कोरोना विषाणूची संसर्गजन्य साथ आल्याने गेला एक महिना संपूर्ण देश लॉक डाऊन झाला आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या विश्वकर्मा समाजाची आर्थिक अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. शासनाने विश्वकर्मा समाजाला आर्थिक सहकार्य करण्याची गरज आहे, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा विश्वकर्मा पांचाळ सुतार समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत कांडेकरी यांनी केले आहे. या मागणीचे निवेदन समाजाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आले आहे.
विश्वकर्मा (सुतार,लोहार,तांबट,शिल्पकार, सोनार) समाजाला गत वर्षी आलेल्या महापुरामुळे प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागले होते. पाठोपाठ कोरोना या रोगामुळे पुन्हा एकदा आर्थिक संकट सुतार समाजापुढे निर्माण झाले आहे. विश्वकर्मा समाज शिक्षणापासून थोडा कमी असल्याने कारागीर म्हणून काम करूनच कुटुंबाचा चरितार्थ चालवण्याची कसरत त्याला करावी लागते. महापूर व कोरोना अशी नैसर्गिक आपत्ती एकापाठोपाठ एक आल्याने संपूर्ण विश्वकर्मा समाज आर्थिक दृष्ट्या हतबल झाला आहे. ना काम ना दाम त्यामुळे जगायचं कसे असा यक्ष प्रश्न विश्वकर्मा समाजापुढे निर्माण झाला आहे. विश्वकर्मा समाजातील कुटुंबाची उपजीविका चालावी यासाठी शासनाने शक्यतो अधिकाधिक आर्थिक मदत करावी, अशी मागणी कांडेकरी यांनी केली आहे.