पालकमंत्री बाळासाहेब पाटील ; शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन
प्रतिनिधी/ सातारा
दिपावली काळात खरेदीसाठी व पै-पाहुण्यांकडे ये-जा करीत असताना मास्कचा वापर करावा व स्वच्छता ठेवावी, सुरक्षित अंतराचे पालन करावे, दिपावली हा दिपोत्सव साजरा करण्याचा व आनंदाचा सण आहे. कोरोना साथीने आपल्यातील अनेक सहकारी व नातेवाईक आपणास सोडून गेले आहेत. त्यांच्या जाण्याची दुख:ची किनार या दिपावली सणास आहे. तरी सातारा जिह्यातील नागरिक बंधू-भगिनींनी सण साजरा करताना शासनाच्या नियमांचे पालन करावे. स्वत:ची व आपल्या कुटुंबियांची काळजी घेवून योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
मार्च 2020 पासून आपल्या देशात कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. त्याचा शिरकाव आपल्या राज्यभर मोठय़ा प्रमाणावर झाला आहे. राज्य शासन व आरोग्य यंत्रणा यांनी साथीचा मुकाबला करण्याचा प्रयत्न केला. सध्याच्या कालावधीमध्ये रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये थोडीशी शिथिलता आलेली दिसून येत आहे. परंतू कोरोनाचे संकट पूर्णपणे टळले नाही. लोक दिपावलीच्या सणाच्या खरेदीसाठी मोठय़ा संख्येने बाहेर पडत आहेत. खरेदीच्या ठिकाणी गर्दी होत आहे. बऱयाच ठिकाणी सुरक्षित अंतराचे पालन केले जात नाही. अनेकजण मास्कचा वापर करीत नाहीत तसेच मास्क वापरला तरी बोलताना मास्क नाकाच्या खाली घेऊन बोलतात. त्यामुळे भविष्यात धोका वाढण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी शासनाने दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहनही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्हावासियांना केले आहे.