’पुन्हा लॉकडाऊनवर’ नागरिकांच्या प्रतिक्रिया : देशभरात वाढणारी बाधितांची चिंताजनक : काळजी घेत चालण्याची गरज
चंद्रकांत देवरुखकर/ सातारा
कोरोना व्हायरसविरुध्द सुरु असलेली लढाई आता अनलॉकच्या दिशेने जात असताना देशभरात कोरोना बाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होत असल्याने नाही म्हटले तरी नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दुसरीकडे सातारा जिल्हय़ात कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 60 टक्केच्या वर असल्याने दिलासा आणि भीती असे वातावरण आहे. यामध्ये आता गेल्या दोन तीन दिवसात पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याच्या अफवाही पिकू लागल्या आहेत. याबाबत नागरिकांशी संवाद साधला असता ’कोरोना संपवायचय, अन जगायचंय पण’ त्यामुळे लॉकडाऊन कडक करण्याऐवजी काळजी घेत जगूया कारण पुन्हा लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणारी माणसं उपासमारीने मरतील, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.
देशभरात गेल्या 24 तासांमध्ये नवीन रूग्णांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3, लाखाच्या वर पोचली आहे. तर, गेल्या 24 तासांमध्ये, म्हणजेच एका दिवसात सर्वाधिक म्हणजेच 10 हजार 956 नवे रुग्ण आढळले. तर, गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे 396 रुग्ण मृत्युमुखी पडले. देशाचा विचार करता आतापर्यंत एकूण 1 लाख 49 हजार 767 कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत आणि घरी गेले आहेत. सध्या देशात एकूण 1 लाख 43 हजार 259 सक्रिय रुग्ण असून देशभरात एकूण 8,553 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
ही देशाची स्थिती असताना महाराष्ट्रात वाढणारी बाधितांची संख्या अंगावर काटा आणत आहे. यामध्ये पुणे, मुंबईसह कार्पोरेट शहरांमध्ये त्याचे प्रमाण जास्त आहे. मात्र तरी देखील राज्यात लॉकडाउनमध्ये शिथिलता आणताना अनेक गोष्टींमध्ये सूट देण्यात आली आहे. मात्र लॉकडाउनचे काही निर्बंध शिथिल केल्यानंतर लगेचच रस्त्यांवर, बाजारात लोकांची मोठी गर्दी होताना दिसतेय. त्यामुळे अनावश्यक गर्दी टाळली नाही तर पुन्हा एकदा नाईलाजाने लॉकडाउनचे सर्व निर्बंध लागू करण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता.
या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन करावा का याबाबत तरुण भारत ने नागरिकांशी संपर्क साधला असता बऱयाच अंशी सातारा जिल्हय़ातील कोरोनाची स्थिती पाहता नागरिकांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यामध्ये आता कोणालाच पुन्हा लॉकडाऊन नको आहे. सार्वजनिक बस, रेल्वे या सुविधा तसेच गर्दीची ठिकाणे बंद असावीत मात्र काळजी घेवून यापुढे जगताना कोरोनाचे गांभीर्य मनात ठेवूनच नागरिकांनी वाटचाल करावी लागणार आहे. त्यासाठी कडक लॉकडाऊन नको असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.
प्रत्येकाने नियम पाळावेत, काळजी घ्यावी
राज्यातील करोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. त्यामुळे विनाकारण गर्दी करू नका. मॉर्निंग वॉकसाठी गर्दी करू नका. गर्दी होणार नाही याची काळजी सर्वांनी घेणे महत्त्वाचे आहे. सरकार जनतेसाठीच पावले उचलत असल्याचे जनता जाणते. आतापर्यंत लोकांनी सहकार्य केले आहे. मात्र, आता पावसाळा सुरु होणार असून काही महिने सर्वांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. यामध्ये लॉकडाऊन कडक करण्यापेक्षा आवश्यक शिथीलता देत लोकांचे जगणेही सुसहय़ करणे आवश्यक आहे. स्वतः काळजी घेणे हाच खरा लॉकडाऊन असेल.
डॉ. अमित सय्यद, सातारा
आपल्याकडील फोटो वापरावा.
100 टक्के लॉकडाऊन आता शक्य नाही
गेले दोन अडीच महिने कडक लॉकडाऊन पाळलाय. या काळात ज्यांचे हातावर पोट होते त्यांचे तसेच मजूर, कष्टकरी वर्गाचे प्रचंड हाल झालेत. सर्वांच्या जगण्यासाठी आता कामधंदे सुरु होणे आवश्यक आहे. काही मुर्ख माणसांमुळे कोरोना फैलावू शकतोय हे खरे असले तरी पूर्ण लॉकडॉऊन हा उपाय आता जनता स्वीकारणार नाही असे वाटते. एकीकडे वाढती महागाई आणि हाताला कामच नाही. मग लॉकडाऊन केला तर ऐन पावसाळय़ात गरीब, हातावर पोट असणारी माणसे उपासमारीने मरतील. त्यापेक्षा प्रत्येकाने काळजी घेत जगणे शक्य आहे. ज्या मोठय़ा शहरांमध्ये गंभीर स्थिती आहे तिथे काही दिवस कडक लॉकडाऊन गरजेचा आहे. प्रत्येकाने नियम, शिस्त पाळून स्वतःसह समाजाचे जगणे सुसहय़ करण्याची गरज आहे.