पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन
प्रतिनिधी / सातारा
सातारा जिह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. संसर्ग झालेल्या अत्यावस्थ व्यक्तीला ऑक्सिजनची आवश्यकता असेल तर तो रुग्ण हा बेडपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याबरोबर ज्या रुग्णालयांमध्ये कोरोना संसर्गावर उपचार केले जात आहेत अशा रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू देवू नका, तसेच नागरिकांनी देखील काम असेल तरच घराबाहेर पडावे, अशा सूचना पालकमंत्री बाळसाहेब पाटील यांनी केल्या.
दरम्यान, बाधित वाढीचा वेग वाढला असला तरी कोरोनामुक्तीचाही वाढणारा वेग दिलासादायक असून सोमवारी सांयकाळी अहवालात 303 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
वाढत्या रुग्ण संख्येने प्रशासन अर्लट
वाढत्या रुग्ण संख्येने प्रशासन अर्लट झाले असून जिह्यातील कोरोना संसर्गाबाबत आढावा बैठक सोमवारी सातारा शासकीय विश्रामगृहात झाली. यावेळी पालकमंत्री पाटील बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे. जगदाळे आदी उपस्थित होते. विविध उपाय योजनांचा आढावाही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी घेतला.
संसर्ग रोखणे ही सर्वांचीच जबाबदारी
कोरोना संसर्ग रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध करुन ठेवा. प्रत्येक तालुक्यातील रुग्णवाहिकेची मागणी आल्यास तात्काळ उपलब्ध करुन द्या. कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे यासाठी आवाहन करावे. कोरोना संसर्ग रोखणे हे शासनाची, प्रशासनाची जबाबदारी आहे तशीच नागरिकांची मोठी जबाबदारी आहे. प्रत्येक नागरिकाने मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता केली पाहिजे, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी बैठकीत केले.
वाढता उकाडा अन वाढता कोरोना
गतवर्षी मार्चमध्ये जिल्हय़ात फक्त दोन बाधित समोर आले होते. वर्षभरानंतरच्या मार्चमध्ये तापमान प्रचंड वाढत असून वाढता उकाडा अन वाढता कोरोना अशा कचाटय़ात नागरिक सापडलेत. त्यातच शेवटी संचारबंदी लागू करण्याची वेळ लोकांच्या बेशिस्तीमुळे आलीय. लग्नात, मार्केटमध्ये केलेली गर्दी अंगाशी येवू लागलीय. त्यामुळे आता तरी बेशिस्त नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडूच नये. बाहेर पडलाच तर मास्क आणि सुरक्षित अंतर हे नियम पाळाच अन्यथा कोरोनाचे संकट घोंगावतच राहणार आहे.
जिल्हय़ात 474 नवीन रुग्णांची भर
रविवारी रात्री आलेल्या अहवालाने पुन्हा जिल्हय़ाची चिंता वाढवली आहे. तब्बल 474 नवीन बाधितांची भर पडली खंडाळा सोडल्यास सर्व तालुक्यांमध्ये झालेली रुग्ण वाढ नागरिकांना भीती दाखवू लागलीय. ऑक्टोबर महिन्यातील स्थिती पुन्हा उद्भभवू लागली असून त्यासाठी प्रशासन अलर्ट झाले आहे. या अहवालात सातारा 107, खटाव 81, कोरेगाव 43, वाई 41, कराड 31, पाटण 29, माण 29, फलटण 28, जावली 31, महाबळेश्वर 32, खंडाळा 12 अशी सर्व जिल्हय़ात वाढ झाली आहे.
जिल्हय़ात 4 बाधितांचा मृत्यू
जिल्हा रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये दुधणेवाडी, ता. कोरेगाव 59 वर्षीय पुरुष, भीमनगर, ता. फलटण 60 वर्षीय पुरुष व जिह्यातील विविध खाजगी कोविड रुग्णालयामध्ये सांगवी ता. खंडाळा 75 वर्षीय महिला, लोणंद, ता. खंडाळा 72 वर्षीय पुरुष असे एकूण 4 बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.