मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा इशारा : लोकांना मार्गदर्शक तत्वांच्या पालनाची विनंती.निर्बंध तातडीने लागू केल्यास व्यवसायावर परिणाम
प्रतिनिधी /पणजी
राज्यात कोरोनाचे रुग्ण व संसर्गाचा दर वाढत राहिला तर कडक निर्बंध लागू करण्याचा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला असून त्या संदर्भातील अंतिम निर्णय नवीन वर्षात म्हणजे येत्या सोमवारी 3 जानेवारी 2022 रोजी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
रात्रीची संचारबंदी किंवा इतर कोणतेही निर्बंध आता तातडीने लागू केले तर त्याचा विपरित परिणाम पर्यटन व्यवसायकांवर, पर्यटकांवर होऊन ते अडचणीत सापडण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखवली असून पर्यटकांसह स्थानिक जनतेने काळजी घ्यावी, मार्गदर्शक तत्वे एसओपी पाळावी असे आवाहन केले आहे. कोरोना लसीकरणापासून दूर राहिलेले लोक लसीकरणासाठी जर लोक पुढे येत नसतील तर लसीकरणाची सक्ती करावी लागेल, असेही त्यांनी सूचित केले आहे.
परिस्थितीच्या आढाव्यानंतर होणार निर्णय
ऑनलाईन माध्यमातून घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. सावंत यांनी वरील माहिती देऊन सांगितले की 3 जानेवारी रोजी कोरोनाच्या जलद कृती समितीची (टास्क फोर्स) बैठक होणार असून त्यात एकंदरीत कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल आणि त्यानंतरच तज्ञ समितीच्या विविध शिफारशीबाबत निर्णय होईल, असे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.
पंधरा ते अठरा वयोगटाचे लसीकरण
डॉ. सावंत पुढे म्हणाले की 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लस देण्याचे काम सुरु होणार असून त्यासाठी 1 जानेवारीपासून पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी चालू करण्यात येणार आहे.
अठरा वर्षे झालेल्यांनी पहिला डोस घ्यावा
ज्यांना अलिकडेच 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांनी कोरोनाचा प्रथम डोस आणि त्यानंतर ठरलेल्या मुदतीत दुसरा डोस घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
दहा जानेवारीपासून बुस्टर डोस
येत्या 10 जानेवारीपासून बुस्टर डोस देण्यात येणार असून तो प्रथम आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा यांना मिळणार आहे. त्याची सर्व तयारी आरोग्य खात्यातर्फे करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
… अन्यथा सहा टक्के लोकांना लसीकरण सक्ती
कोरोनाचा दुसरा डोस 94 टक्के जनतेने घेतला असून उर्वरित 6 टक्के जनता तो घेण्यास विलंब लावत आहे व टाळाटाळ करीत आहे. तो त्यांनी लवकरात लवकर घ्यावा, नाहीतर त्याची सक्ती करावी लागेल आणि तसा सरकारचा विचार चालू आहे, असे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.
ओमाक्रॉनची चाचणी गोव्यातच होणार
ओमायक्रॉन कोरोना चाचणी गोव्यात होत नसल्याने ते नमुने पुण्याला पाठवावे लागतात आणि त्यांचा अहवाल येण्यास अनेक दिवस जातात. ती चाचणी सुविधा गोव्यातच उपलब्ध करण्याचा सरकारचा इरादा असून अमेरीकेतील ‘जेटीगो’ या कंपनीने ती सुविधा गोमेकॉसाठी देण्याचे मान्य केले आहे. येत्या 15 ते 20 दिवसात ती यंत्रणा कार्यान्वित होईल, असे डॉ. सावंत म्हणाले. त्यात सुमारे एक वर्षभर मोफत ओमायक्रॉन चाचणी करण्याची सोय उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकांनी स्वतः काळजी घ्यावी
लग्न समारंभामुळे कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे सांगून लोकांनी मेळावे- समारंभ टाळावेत. मास्क वापरुन काळजी घ्यावी, लसीकरण करावे आणि कोरोनाला दूर ठेवावे तसेच लक्षणे दिसली तर कोरोना चाचणी करुन घ्यावी, अशी विनवणी त्यांनी केली आहे.