प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लाखो लोकांचे स्थलांतर झाले आहे. कोकणातही लाखो चाकरमानी आपल्या मूळ गावी कुटुंबासह दाखल झाले आहेत. त्यासोबत अनेक प्रश्न देखील नव्याने तयार होत आहेत. स्थलांतरीतांच्या मुलांना शाळेत प्रवेश देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषद सज्ज झाली आहे. अशी मुले आल्यास आणि त्यांच्याकडे कसलाही दस्तऐवज नसला तरी वयानुरुप शाळा प्रवेश देणे शक्य असून आम्ही तो जरुर देऊ, अशी भूमिका शिक्षण विभागाने दिली आहे.
आतापर्यंत रत्नागिरी जिह्यात सुमारे लाखभर चाकरमानी दाखल झाले आहेत. काहींचा अलगीकरणाचा कालावधी संपुष्टात आला आहे तर काही लोक कुटुंबात किंवा संस्थेत समाजापासून अलग राहत आहेत. चौदा दिवसांनंतर हा कालावधी संपुष्टात येणार आहे. कोरोना आव्हान येत्या महिना दोन महिन्यात असे वाटत नाही. पुढील अनेक महिने कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी विविध पर्यायांचा विचार लोकांना करावा लागणार आहे.
मुंबई-पुणे व अन्य ठिकाणाहून गावी आलेल्या चाकरमान्यांची मुले आव्हान काळात कोणत्या शाळेत जाणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या ही मुले आपल्या आई-वडीलांसोबत कोकणातील मूळ गावी आली आहेत. शासनाने परवानगी दिल्यास योग्य काळजी, उपायांच्यासोबत जून किंवा जुलैमध्ये शाळा सुरु होण्याची शक्यता आहे. शाळा सुरु झाल्यास मुले त्यांच्या मूळ शाळेत म्हणजे मुंबई-पुण्यातील शाळांमध्ये उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, अशी भीती पालकांना वाटत आहे.
शिक्षण हक्क अधिनियम यापूर्वीच लागू झाला आहे. याप्रमाणे 6 ते 14 या वयोगटातील कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, अशी जबाबदारी शासन यंत्रणेने घेतली आहे. या वयोगटातील प्रत्येक मुलांना घरापासून नजीकच्या अंतरावरील शाळेत प्रवेश देणे आवश्यक ठरवण्यात आले आहे. इयत्ता पाचवीपर्यंतच्या मुलांना 1 किलोमीटर व आठवीपर्यंतच्या मुलांना 3 किलोमीटर एवढय़ा हवाईअंतराच्या मर्यादेत नजीक असणाऱया शाळेत प्रवेश देणे कायद्याने आवश्यक ठरवण्यात आले आहे.
कायद्यातील तरतुदींचा विचार करुन विद्यार्थ्याकडे कोणत्याही स्वरुपाचे कागदपत्र नसतील तरी त्या विद्यार्थ्याला प्रवेश देणे जिल्हा परिषद, नगर परिषद प्रशासनाला आवश्यक ठरणार आहे. खासगी अनुदानीत शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश क्षमता उपलब्ध असल्यास अशा स्थलांतरीत मुलांचा समावेश नियमित विद्यार्थ्यांमध्ये करण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे या संदर्भात चौकशी केली असता सांगण्यात आले की, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुलाला प्रवेश देण्याची तयारी ठेवण्यात आली आहे. अशा मुलांच्या पालकांनी स्थानिक शाळा व्यवस्थापनाशी संपर्क साधल्यास प्रवेश नक्की करण्यात येईल. कोणतीही अडचण आल्यास गटशिक्षणाधिकाऱयांशी संपर्क साधावा.
वयानुरुप प्रवेश शक्य : निशादेवी वाघमोडे
स्थलांतरीत कुटुंबापैकी कोणतेही मुल 6 ते 14 वयोगटातील असेल तर त्याला वयानुरुप शाळेत प्रवेश देणे शक्य आहे. या संदर्भात आम्ही योग्य ती कार्यवाही करु, अशी प्रतिक्रिया रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी दिली.
स्थलांतरीतांच्या मुलांचे स्वागत : स्नेहा कीर
स्थलांतरीत कुटुंबापैकी कोणत्याही मुलाला इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत प्रवेश हवा असेल तर त्यांनी संपर्क साधावा. आम्ही शाळेत अशा मुलांना प्रवेश देण्यास उत्सुक आहोत, असे प्रतिपादन रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी बुद्रुक येथील शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहा कीर यांनी दिली.