ऑनलाईन टीम / पाटणा :
बिहार राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झालेला दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर नितीश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, राज्यातील शाळा-कॉलेज, दुकाने, मॉल, पार्क आणि धार्मिक स्थळे खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला असता राज्यातील परिस्थितीमध्ये सुधारणा होत आहे. त्यामुळे सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, शाळा-कॉलेज, दुकाने, मॉल, पार्क आणि धार्मिक स्थळे सामान्यपणे सुरू केली जाणार आहेत. मात्र यावेळी सर्वांना सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य असणार आहे.
कशामध्ये मिळाली सुट ?
- सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, दुकाने, मॉल, पार्क आणि धार्मिक स्थळे सामान्यपणे सुरू केली जाणार आहेत.
- जिल्हा प्रशासनाच्या परवानगीने सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, मनोरंजन, खेळ, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम सर्व नियमांचे पालन करीत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
- सर्व शाळा-कॉलेज, तकनिकी संस्था, कोचिंग क्लासेस सुरू केले जाणार आहेत.
- 50 टक्के क्षमतेनुसार सिनेमा हॉल, क्लब, जीम, स्विमिंग पूल, रेस्टॉरंट आणि खाद्य पदार्थांची दुकाने सुरू केली जाणार आहेत.
बिहारमध्ये 102 रूग्णांवर उपचार सुरू :
बिहारमधील कोरोना रूग्ण संख्येत लक्षणीय प्रमाणात घट होताना दिसत आहे. मंगळवारी राज्यात केवळ 9 नवे कोरोना रूग्ण आढळून आले तर 19 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्य स्थितीत 102 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. बिहारमध्ये आता पर्यंत 7.25 लाख रूग्णंना कोरोनाची लागण झाली आहे. तर 9 हजार 650 जणांनी आपला जीव गमावला आहे.