प्रतिनिधी / सांगली
जिल्हय़ातील कोरोनाची स्थिती हाताबाहेर गेली आहे. कोरोनाचा समुह संसर्ग वेगाने वाढत चालल्याने दिवसेंदिवस रूग्ण वाढत आहेत. वेळेत उपचार न मिळाल्याने रूग्ण दगावण्याची संख्याही वाढली आहे. 400 हून अधिक बळी कोरोनाने गेले आहेत. जिल्हय़ातील मृत्यूदर चार टक्केवर गेला आहे. त्यामुळे सांगली धास्तावली आहे. अशा स्थितीत कोरोनाला कसे आटोक्यात आणायचे हा यक्ष प्रश्न प्रशासन आणि पालकमंत्री यांच्यासमोर उभा ठाकला आहे. वेळीच याला आवर न घातल्यास परिस्थिती आणखी बिकट होवू शकते हेही तितकेच खरे आहे.
जिल्हय़ात समुह संसर्ग
जिल्हय़ात कोरोनाचा समुह संसर्ग झाला आहे. त्यामुळे दररोज सरासरी 350 पेक्षा अधिक रूग्ण आढळून येत आहेत. या सर्वांवर तातडीने उपचार करण्यासाठी जिल्हय़ात कोणतीही पुरेशी वैद्यकीय यंत्रणा कार्यन्वित करण्यात आली नाही. त्यामुळे कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी स्वतःच स्वतःची काळजी घेणे आता गरजेचे झाले आहे. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला हे समजल्यानंतरच रूग्णांचे मानसिक खच्चीकरण होवू लागले आहे. त्याला तातडीने बेड व वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत नसल्याने नातेवाईकांचे हाल सुरू आहेत. यामध्येच खासगी दवाखान्याने अव्वाच्यासव्वा बिल आकारण्यास प्रारंभ केल्यामुळे कोरोना रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक वैतागले आहेत. यावर उपाय काय याचे उत्तर मात्र अद्यापही कोणाकडेच नाही.
जिल्हय़ात फक्त तीन हजार 200 बेडचीच क्षमता
जिल्हय़ात सध्याच्या घडीला फक्त तीन हजार 200 बेडची क्षमता आहे. यामध्ये सौम्य लक्षणे असणाऱया लोकांसाठी 1200 बेड उपलब्ध आहेत. तर त्यापेक्षा अधिक तीव्र लक्षणे असणार्यांना 245 बेड, कोरोनाचा अतिसंसर्ग झाला आहे अशा लोकांवर उपचार करण्यासाठी 1806 बेड उपलब्ध आहेत. पण सध्याच्या घडीला उपचार सुरू असणारे रूग्ण साडेतीन हजार आहेत. त्यातील काहीजण हे गृह अलगीकरणामध्ये आहेत. दररोज वाढणार्या 300 रूग्णांसाठी नवीन बेड शिल्लकच नसल्याने गरजू आणि गंभीर रूग्णाला वेळेत उपचार मिळत नाहीत. त्यामुळे जिल्हय़ात कोरोनाचा मृत्यूदर राज्य आणि देशापेक्षा अधिक झाला आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे तातडीने नवीन बेड उपलब्ध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजेत तरच यावर उपाय निघू शकतो.
मोठय़ा संख्येने रूग्ण वाढल्याने उपचाराला दिरंगाई
जिल्हय़ात मोठय़ासंख्येने रूग्ण वाढत चालले आहेत. या रूग्णांना बरे करण्यासाठी मात्र वैद्यकीय यंत्रणाही अपुरी आहे. मोठय़ा संख्येने डॉक्टर, नर्स आणि इतर सपोर्ट स्टॉफ उपलब्ध नाही. तसेच या रूग्णांवर उपचार सुरू केल्यानंतर त्याच्यावर इलाजाचा काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी ही या स्टॉफला वेळ नाही. त्यामुळे सर्व काही अंधातरीच सुरू आहे. यामुळे लोक घाबरून गेले आहेत. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आणण्याची गरज आहे. पण हेच प्रशासनाला जमत नसल्याने लोकांच्या चिंता आणखीन वाढल्या आहेत. राजकीय पदाधिकाऱयांपर्यंत या नागरिकांच्या भावना पोहचत आहेत. पण त्यांच्याकडूनही अपेक्षित परिणाम तसेच कृती होत नसल्याचे समोर येत चालले आहे.
इतर आजारावरील डॉक्टरांच्या दुर्लक्षाने रूग्ण दगावत आहेत
जिल्हय़ात इतर आजार असणाऱया रूग्णांवर डॉक्टर इलाज करण्याआधी त्याला कोविडची टेस्ट करून येण्याचा सल्ला देतात. ती व्यक्ती कोविडची टेस्ट करण्यास गेल्यावर पॉझिटिव्ह येते. त्याचे मुख्य दुखणे आणि मुख्य आजार बाजूलाच राहतो व त्याच्यासाठी नातेवाईकांना कोरोना रूग्णालयाचे दरवाजे ठोठावण्याची वेळ येत चालली आहे. इतर आजाराच्या डॉक्टरांनी तातडीने जर या रूग्णांवर उपचार केले तर हे रूग्ण त्या रोगापासून निश्चितच बरे होवून वाचू शकतील पण हे घडताना सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे अनेकजण घाबरूनच हा रोग अंगावर काढत आहेत आणि त्यातच त्यांचा मृत्यू होत चालला आहे.
मोफत उपचाराचे तर तीन तेरा
जिल्हय़ात कोरोना जुलैच्या सुरूवातीपर्यंत आटोक्यात होता. त्यावेळी सर्व रूग्णांच्यावर मोफत उपचार होत होते. पण जुलैनंतर रूग्णसंख्या वेगाने वाढत गेली त्यानंतर खासगी दवाखान्यांना उपचार करण्याची परवानगी दिली. या खासगी रूग्णालयानी शासनाने दिलेल्या नियमानुसार उपचार करण्यापेक्षा अधिक रक्कम घेवून उपचार सुरू केला. त्यामुळे कोरोना बाधितांना लाखो रूपयांचा फटका बसत चालला आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना फक्त अत्यवस्थ रूग्णांसाठीच असल्याने इतर रूग्णांना मात्र सर्व उपचार पैसे भरूनच करावे लागत आहेत त्यामुळे जिल्हय़ात मोफत उपचाराचे तीन तेरा वाजले आहेत.
घाबरून जावू नका, मानसिक धैर्य सोडू नका – डॉ. साळुंखे
जिल्हय़ात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. पण यातील 80 टक्के रूग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. तसेच त्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे. अशा व्यक्तींना कोरोनापासून कोणताही धोका नाही. उर्वरित 20 टक्केमधील 10 टक्के ज्या रूग्णांची ऑक्सिजन पातळी 85 ते 90 अशी राहत आहे. त्यांना फक्त ग्रामीण रूग्णालये किंवा अदिसागर मंगल कार्यालयासारख्या साध्या कोविड उपचार केंद्रात व्यवस्थित उपचार केल्यास त्यांचा कोरोना पूर्णपणे बरा होतो. राहिलेले 10 टक्के रूग्ण हे गंभीर आणि अत्यवस्थ असतात. ज्यांची ऑक्सिजनची पातळी 85 ही पेक्षाही कमी झाली आहे. त्याला इतर आजार ही असतात ज्यांचे वय 55 पेक्षा अधिक आहे. अशा रूग्णांवर कोरोना रूग्णालयातच उपचार करावे लागतात. कारण हे रूग्ण कोरोनाने गंभीर स्वरूपाचे बनलेले असतात. पण ज्यांना लक्षणे नाहीत. सौम्य लक्षणे आहेत अशाच रूग्णांनी सध्या दवाखान्यातील बेड भरले आहेत. त्यामुळे गंभीर रूग्णांना तातडीने बेड मिळत नाहीत आणि हे गंभीर रूग्ण दगावण्याची संख्या वाढली आहे. हे सत्य आहे. हे चित्र बदलण्यासाठी लोकांनीच आता समजून घेतले पाहिजे. तसेच रूग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी मानसिक धैर्य सोडू नये, घाबरून जावू नये कोरोना हा निश्चितच बरा होणारा रोग आहे. असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले.