पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राष्ट्राला उद्देशून संदेश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातून कोरोनाची माघार सुरू झाली आहे. तथापि, लोकांनी अत्याधिक दक्षता घेणे आणि आरोग्य विषयक नियम तसेच शारिरीक अंतर यांचे कसोशीने पालन करणे आवश्यक आहे. जोपर्यंत कोरोनावर लस किंवा औषध शोधले जात नाही, तोपर्यंत निष्काळजीपणाला कोणताही वाव नाही, असा स्पष्ट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. ते मंगळवारी संध्याकाळी राष्ट्राला उद्देशून संदेश देत होते. त्यांच्या पंधरा मिनिटांच्या वक्तव्यात त्यांनी कोरोना स्थितीचा आढावा घेतला.
भारतात कोरोनाच्या अनेक लसींवर काम सुरू आहे. या लसी लवकरात लवकर उपलब्ध होतील अशी शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. मात्र, त्या जोपर्यंत प्रत्यक्ष उपलब्ध होत नाहीत, तो पर्यंत आपण आपले आरोग्य व्यवस्थितरित्या सांभाळले पाहिजे. ढिलाई किंवा हलगर्जीपणाला कोणताही थारा देता कामा नये. थोडासा निष्काळजीपणाही धोक्याचा ठरू शकतो, याची पुरेपूर जाणीव सर्वांनी ठेवावयास हवी, अशी स्पष्टोक्ती पंतप्रधान मोदींनी संदेशात केली.
जनतेचे उत्कट सहकार्य
कोरोनाशी होत असलेल्या या संग्रामात सर्व लोकांचे उत्कट सहकार्य मिळत आहे. लोक स्वतःहून या संग्रामात आपली भूमिका साकारत आहेत. आरोग्य विषयक नियम आणि शारिरीक अंतराचा नियम बहुतेकांकडून पाळला जात आहे. यामुळेच देशात मोठय़ा प्रमाणावर लोकांचे प्राण वाचविण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत. हे जनतेच्या संघटित प्रयत्नांचे यश आहे, अशी प्रशंसा त्यांनी केली.
डॉक्टर, परिचारिकांचे अथक परिश्रम
‘सेवा परमोधर्मः’ या तत्वानुसार कोराना हटविण्याच्या या संघर्षात देशातले लक्षावधी डॉक्टर्स, परिचारिका, परिचारक आणि इतर वैद्यकीय कर्मचारी यांनी अथक परिश्रम केले. त्यांनी खरोखरच कौतुकास्पद कामगिरी बजावली. आजही ते स्वतःची चिंता न करता काम करीत आहेत. साऱया देशाने त्यांचे आभारी राहिले पाहिजे. या प्रयत्नांमुळेच आपण आज समाधानकारक स्थितीत आहोत. याचे श्रेय त्यांना दिले पाहिजे, अशी भलावण त्यांनी केली.
सरकारकडून शक्य ते सर्व…
कोरोनाला रोखण्यासाठी सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहे. लसीच्या संशोधनाला प्राधान्य देण्यात येत असून जिथे कोठे लस निर्माण होईल, तेथून ती साऱया देशापर्यंत पोहचविण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात येत आहे. त्यामुळे लोकांनी लस येईपर्यंत धीर धरावा, असेही आवाहन पंतप्रधान मोदींनी केले.