मणेरीच्या कन्या सेवा लीलावतीमध्ये योद्धा : कोरोनावर मात करीत पुन्हा रुग्णसेवेत
तेजस देसाई / दोडामार्ग:
आपल्याला कोरोना झाला, असे समजले तरी अर्धेअधिक अंग नकारात्मक विचारांनी गळून पडते. पण, कोरोना रुग्णांना जीवनदान देण्याचे व्रत अंगिकारलेल्या आरोग्य कर्मचाऱयांना सलाम करावासा वाटतो. आरोग्य अधिकाऱयांना रुग्णांची सेवा करताना कोरोनाने घेरले. पण, काहींनी कोरोनावर मात करीत आपण आरोग्य सेवेचे व्रत अंगिकारल्याचे दाखवून देत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. यातील एक नाव म्हणजे रुपाली होय. मुंबईत आरोग्यसेवा देत असताना तिला कोरोना झाला. तिने दहा दिवसात कोरोनाला हरवले आणि घरी बसून न राहता ती पुन्हा कामावर हजर झाली, रुग्णांच्या सेवेसाठी.
कोरोना महामारीने जगात हाहाकार माजवला आहे. भारतामध्येही कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या काळात सर्वांत धीराने आणि ज्यांचा आपण सर्वांना गर्व वाटावा, असा लढा देत काम करणारा विभाग म्हणजे आरोग्य विभाग व त्यांचे कर्मचारी. कोरोनाच्या कठीण काळात सर्वांत हॉटस्पॉट ठिकाण म्हणजे मुंबई. याच मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये जीवाची पर्वा न करता आपली सेवा प्रामाणिकपणे मणेरीची सुकन्या रुपाली पुरुषोत्तम उगवेकर ही बजवत आहे. तिची आई-वडील प्राथमिक शिक्षक होते. लग्न झाल्यावर ती रुपाली संतोष कदम (देवगड) बनली.
रुपालीचे बारावीपर्यंतचे शिक्षण गावीच झाले. ती अभ्यासात हुशार होती. बारावीनंतर परिचारिकेचा (नर्सिंग) कोर्स पूर्ण करून रुग्णांची सेवा करावी, अशी तिची इच्छा होती. या इच्छेप्रमाणे जे. जे. हॉस्पिटल मुंबई इथे तिचे टेनिंग पूर्ण झाले. तिला फर्स्ट क्लास मिळाल्यामुळे व इंग्रजीवर प्रभूत्व असल्यामुळे लीलावती हॉस्पिटलमध्ये ती आपल्या सेवेत रुजू झाली. लीलावती हॉस्पिटलमध्ये घेण्यात येणाऱया परीक्षा देत आता हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये कार्यरत आहे. पण, सध्या कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे ती पीपीई कीट घालून कोरोना रुग्णांच्या सेवेत रुजू आहे. सेवा करता-करता तिला कोरोनाची बाधाही झाली. पण, ती न घाबरता आता बरी होऊन पुन्हा सेवेत रुजू झाली. तिच्या बहिणी घाबरायच्या. पण, ती घाबरत नव्हती. ती म्हणते, ‘मी कोरोना योद्धा आहे. कोरोना हरेपर्यंत मी लढत राहणार.’ लीलावती हॉस्पिटलमध्ये बावीस वर्षे तिची सेवा झाली आहे. या हॉस्पिटलने बऱयाचवेळा तिचा सत्कार केलेला आहे. कोरोनाच्या आजारात बरी होऊन ती जेव्हा घरी परतली तेव्हा तिच्या सोसायटीतल्या सर्व लोकांनी खाली उतरून टाळय़ा वाजवून तिचा सत्कार केला. ‘कदमांच्या वाघाणीचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या. उगवेकरांच्या घराण्यातील सुकन्या पण तिने उगवेकरांचे आणि कदमांचे नाव उज्ज्वल केले.