ऑनलाईन टीम / अलिबाग :
अलिबागच्या कोर्लई गावात रश्मी ठाकरे यांच्या मालकीचे बेकायदेशीर 19 बंगले असल्याचा आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांनी हे आरोप सिद्ध करावेत. अन्यथा जोड्याने मारु, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला होता. दरम्यान, या सर्व प्रकरणानंतर कोर्लईचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी या 19 बंगल्यांमागचं गौडबंगाल उघड केलं.
मिसाळ म्हणाले, कोर्लईमध्ये अन्वय नाईक यांच्या मालकीची जमीन होती. 2009 मध्ये त्यांनी या ठिकाणी 18 कच्ची घरं उभारली. मात्र सीआरझेडच्या नियमांमुळे ही घरे तोडण्यात आली. त्यामुळे नाईक यांचा या जागेवर रिसॉर्ट बांधण्याचा मानस पूर्ण होऊ शकला नाही. त्यानंतर त्यांनी 2014 मध्ये रश्मी उद्धव ठाकरे आणि मनिषा रविंद वायकर यांना ही ही 9 एकर जमीन विकली. अन्वय नाईक यांनी 2014 पर्यंत घरपट्टी भरली. मात्र, ही जमीन विकल्यानंतरची घरपट्टी थकली होती. या जागेला पूर्णत: कंपाऊंड आहे. 2021 मध्ये आम्ही पाहणी केली तेव्हा या ठिकाणी घरे नव्हती. त्यामुळे पंचनामा करून आम्ही 26 मार्च 2021 रोजी त्या घरांची नोंद रद्द केली. त्याआधी ही घरं केवळ कागदावर अस्तित्वात होती. त्यामुळे तोपर्यंतची घरपट्टी त्यांनी आरटीजीएसच्या माध्यमातून भरली आहे. त्यामुळे सोमय्यांनी रश्मी ठाकरे यांच्यावर केलेले आरोप खोटे असल्याचे मिसाळ यांनी सांगितले.