ऑनलाईन टीम / कोलकाता :
कोरोना संसर्गाचे प्रमाण जास्त असणाऱ्या दिल्ली, मुंबईसह सात शहरांसाठी 6 ते 19 जुलैपर्यंत कोलकाता विमानतळावरून कोणतेही विमान उड्डाण होणार नाही, असे कोलकाता विमानतळाने ट्विट करून सांगितले आहे.
दिल्ली, मुंबई, पुणे, नागपूर, चेन्नई, इंदूर व अहमदाबाद या शहरांमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक असल्याने या शहरांसाठी 6 ते 19 जुलै या कालावधीत कोणत्याही विमान उड्डाणांचे नियोजन करू नये, अशी विनंती पश्चिम बंगालचे मुख्य सचिव राजीव सिन्हा यांनी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला 30 जून रोजी केली होती. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने पश्चिम बंगाल सरकारची विंनती मान्य केली आहे.
कोरोनाला अटकाव करण्यासाठी हे तात्पुरते निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 6 ते 19 जुलैपर्यंत अथवा पुढील निर्णय येईपर्यंत या सात शहरांसाठी कोलकात्यातून कोणतेही उड्डाण होणार नाही, असेही त्या ट्विटमध्ये म्हटले आहे.