मद्य उद्योजक जय धवन याचा बुडून मृत्यू
प्रतिनिधी /मडगाव
गोव्यात कोरोना महामारीचे संकट अद्याप टळलेले नाही. दररोज एक-दोन बळींची नोंद होत असते. त्यात संक्रमित रूग्णांची संख्या देखील 50 च्या खाली आलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यात कर्फ्यु चालू ठेवलाय आणि याच कर्फ्युत गोव्यात नाईट लाईफ जोरात चालू आहे. याच नाईट लाईफचा शनिवारी रात्री कोलव्यात एका युवा उद्योजकाचा बळी गेलाय.
गोव्यात बनविली जाणाऱया जगप्रसिद्ध अशा ‘ग्रेटर डेन’ या जीनचे डिस्टीलर म्हणून तरूणपणी किमया साधलेल्या जय धवन (26) शनिवारी रात्री आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. ते रात्री आंघोळ करण्यासाठी समुद्रात उतरले असताना पाण्यात बुडाले व त्यांना मृत्यू आला.
फातोर्डा-मडगाव येथे राहणारा हा उद्योजक युवक आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इतर मित्रांबरोबर काल कोलवा येथे गेला होता. त्यानंतर रात्री तो आणि त्याचे आणखी दोन मित्र कोलवा आणि सेर्नाभाटी दरम्यानच्या एकेजागी समुद्र किनाऱयावर गेले असता रात्री साडे बाराच्या सुमारास जय आंघोळ करण्यासाठी समुद्रात उतरला. यावेळी समुद्राला भरती आली होती. त्यामुळे तो पाण्याच्या लाटांबरोबर समुद्रात खेचला गेला.
यावेळी त्याचे अन्य दोन मित्र किनाऱयावर होते. त्यांनी हा प्रकार पाहिल्यावर त्यांनी तातडीने पाण्यात उतरून त्याला बाहेर काढले. लगेच 108 रुग्णवाहिका आणून त्याला हॉस्पिसियो इस्पितळात नेण्यात आले. मात्र, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आल्याची माहिती कोलवाचे पोलीस उपनिरीक्षक अजित वेळीप यांनी दिली.
धवन याचे नाव मद्य उद्योग जगतात प्रसिद्ध असून उच्चभ्रू पर्यटकाकध्ये लोकप्रिय असलेल्या ग्रेटर डेन आणि हापुसा जीन या मद्याचा डिस्टीलर म्हणून त्याने नाव कमावले होते. रविवारी मडगावच्या जिल्हा इस्पितळात त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आल्याची माहिती कोलवा पोलिसांनी दिली.
कर्फ्यु काळातही ‘नाईट लाईफ’
कोरोना महामारीमुळे राज्यात सरकारने कर्फ्य़ु जारी केला असला तरी गोव्यातील नाईट लाईफ वर त्याचा परिणाम झालेला नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. यापुर्वी देखील कर्फ्यु असताना देखील बेतालभाटी येथे आपल्या मित्रा सोबत गेलेल्या दोन मुलीवर बलात्कार होण्याची घटना घडली होती. त्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या युवा मद्य उद्योजकाचा बळी गेला आहे. त्यामुळे कर्फ्यु कुणासाठी व कशासाठी हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.