दीड-दोनशे वर्षापूर्वीच्या पाराने जपली धार्मिक-सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय ओळख
सुधाकर काशीद / कोल्हापूर
अंबाबाईच्या मंदिरात घाटी दरवाज्याच्या थोडे पुढे वडाचे एक विस्तीर्ण झाड आहे. त्या झाडाखाली गोलाकार दगडी पार आहे. हा पार दीड-दोनशे वर्षापूर्वीचा. मंदिरात आलं, देवीचं दर्शन घेतलं आणि या पारावर थोडावेळ निवांत बसले की मन हलके होते अशी एक भावना लोकात आहे. पण त्याहून वेगळी अशी ओळख या पाराची आहे. कोल्हापुरात जाहीर सभासाठी बिंदू चौक 1947 पर्यंत जेव्हा अस्तित्वात नव्हता, तेव्हा धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच एक सार्वजनिक व्यासपीठ म्हणून रामाच्या पाराने मोठा वाटा उचलला. उद्या पारा जवळच्या राम मंदिरात राम नवमीचे मर्यादित कार्यक्रम होणार आहेत. पण या निमित्ताने रामाच्या पाराची धार्मिक-सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय अंगाने नव्या पिढीला ओळख होण्याची गरज आहे.
आता अंबाबाई मंदिरात रोज भाविकांची गर्दी असते. दर्शनासाठी रांग असते. पण अगदी लांब नाही, साठ-सत्तर वर्षांपूर्वीच्या काळात अंबाबाई मंदिरात अगदी निवांतपणा होता. नवरात्र वगळता मंदिरात फारशी गर्दी नसायची. त्या काळात लोकांनी वेगवेगळ्या कारणांसाठी एकत्र येण्यास एक मध्यवर्ती ठिकाण म्हणून रामाच्या पाराला पसंती दिली होती. पारावर सायंकाळच्या वेळी कोणाचे तरी कीर्तन-प्रवचन असायचे. महिला कापसाच्या वाती वळत कीर्तन ऐकत बसलेल्या असायच्या. पारावरच्या वडाच्या झाडाला लटकणाऱया एका बल्बच्या प्रकाशात कीर्तन-प्रवचन रंगत होते. त्या काळात खूप ज्येष्ठ प्रवचनकार व कीर्तनकारांची कीर्तने या पारावर रंगली. या ठिकाणी लोक एकत्र येतात म्हणून तेथे व्याख्याने होऊ लागली. संत गाडगे महाराज बाबांनीही देव देवळात नाही तर मनात आहे. अशी समाजसुधारणेची प्रवचने या रामाच्या पारावरच दिली. कोल्हापूर काँग्रेस स्थापनेची पहिली सभा माधवराव बागल यांच्या अध्यक्षतेखाली याच पारावर भरली.
केवळ प्रवचन-कीर्तन, धार्मिक, कार्यक्रम नव्हे तर सामाजिक सुधारणांची तुतारीही याच रामाच्या पारावर फुंकली गेली. प्रल्हाद केशव अत्रे यांचे भाषण याच पारावर झाले. ज्येष्ठ प्रवचनकार सु. ग. शेवडे यांनी सलग बावन्न वर्ष याच पारावर प्रवचने दिली. त्यामुळे त्या काळात कोल्हापुरात एक सार्वजनिक व्यासपीठ म्हणूनच रामाच्या पाराची ओळख झाली. नवरात्रात तर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध नामवंत कलाकारांनी या पारावर आपली हजेरी लावली. पंडित भीमसेन जोशी यांच्या अभंगवाणीने तर मंदिराच्या शिल्प सौंदर्याला आणखी झळाळी आली.
राम-लक्ष्मण-सीता यांच्या संगमरवरातील मूर्ती
पाराजवळचे रामाचे मंदिर फार प्राचीन नाही. दीडशे वर्षापूर्वी एक साधू राम-लक्ष्मण-सीता यांच्या संगमरवरातील मूर्ती घेऊन अंबाबाई मंदिरात आला होता. तो मूर्ती तेथेच सोडून निघून गेला. त्यानंतर या तीन सुंदर मूर्तीचे काय करायचे असा प्रश्न तयार झाला. त्यावेळी करवीर संस्थांनने अंबाबाई मंदिराच्या आवारात रामाचे मंदिर बांधून दिले. तेथे मूर्तींची प्रतिष्ठापना झाली. झुरळे परिवाराकडे पुजाविधींची सूत्रे आली. या मंदिरासमोरच हा पार आहे. या पारावर विस्तीर्ण अशा वडाच्या वृक्षाची सावली आहे. या पाराची देखभाल संवर्धन अजूनही शहाजी छत्रपती ट्रस्टकडे आहे. आणि अंबाबाई मंदिराच्या साऱया परिसराचे व्यापारीकरण होऊ लागले असले तरीही, या रामाच्या पाराची एक सार्वजनिक व्यासपीठ म्हणून जुनी ओळख आजही कायम आहे.