प्रतिनिधी/कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या दिवसागणिक कायम आहे. प्रशासनाने जिल्ह्यात कोरोना तपासणी वाढवल्याने रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे. तर, दुसरीकडे सर्वांचे लक्ष लॉकडाऊन कधी उठणार याकडे लागून राहिले आहे. यावर अखेर शिकामोर्तब झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या समावेश चौथ्या टप्प्यात झाल्याने आता जे नियम आहेत तेच नियम पुढे देखील कायम राहणार आहेत. यामध्ये कोणताही बदल होणार नाही. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबत आदेश दिले आहेत.
तर, दुसरीकडे व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळात इतर सर्व व्यवसाय, दुकाने बंद आहेत. यामुळे व्यापाऱ्यांचे उत्पन्न थांबले आहे. माप्त विविध कर, कर्मचारी पगार, वीज बिल, कर्जाचे हप्ते असे खर्च थांबलेले नाहीत, ते नियमित सुरुच आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या आदेशाची आता वाट बघणार नसल्याचे सांगत उद्या, सोमवारपासून शहरातील सरसकट सर्व दुकाने उघडण्याचा निर्णय चेंबर ऑफ कॉमर्सच्या काल, झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे व्यापारी आता नेमकी काय भुमिका घेणार याकडे लक्ष लागून राहणार आहे.