दसरा चौकात होणार धरणे सत्याग्रह
प्रतिनिधी /कोल्हापूर
जुलमी, अन्याय-अत्याचारी कर्नाटक सरकारच्या जोखडातून बंधमुक्त होण्यासाठी सीमाभागातील तमाम मराठी बांधवांनी एकीची वज्रमूठ केली असून कोणत्याही परिस्थितीत ‘आम्हाला आता महाराष्ट्रात यायचंय’ या ठाम निर्धाराच्या उद्देशाने महाराष्ट्र एकीकरण समितीने ‘आरपार की लढाई’चे रणशिंग फुंकले आहे. शनिवारी ऐsतिहासिक दसरा चौकात सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत धरणे सत्याग्रह करत कर्नाटक सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यात येणार आहे. दरम्यान, धरणे आंदोलनात सामील होण्यासाठी मोठय़ा प्रमाणात सीमाबांधव कोल्हापुरात दाखल झाले असून कोल्हापूरमधील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, मंत्री, खासदार, आमदार तसेच विविध संघटना सीमाबांधवांच्या लढय़ाला पाठबळ देण्यासाठी धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत.
दसरा चौकातील राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्य़ाला पुष्पहार अर्पण व अभिवादन करून सकाळी 10 वाजता आंदोलनास प्रारंभ होणार आहे.
दसरा चौकात उभारण्यात आलेल्या भव्य मंडपातून सीमाबांधव आपला बुलंद आवाज राज्य सरकारपर्यंत पोहोचविणार आहेत. गेल्या 65 वर्षांपासून कर्नाटक सरकारकडून सीमाभागातील मराठी बांधव व महाराष्ट्रावर होत असलेल्या अन्याय-अत्याचाराला मूठमाती देण्यासाठी सर्व मराठा बांधव, सीमावासीय सर्व शक्तिनिशी आपली ताकद दाखविण्यासाठी सज्ज झाले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समिती खानापूर तालुक्याचे अध्यक्ष, माजी आमदार दिगंबर पाटील, कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे, शहराध्यक्ष विवेक गिरी, समिती नेते प्रकाश चव्हाण, भूविकास बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील, सचिव आबासाहेब दळवी आदींसह कार्यकर्त्यांनी ही चळवळ जोमाने पुढे नेण्याचा निर्धार केला आहे.
आंदोलनास सर्वांनी पाठिंबा द्या
सीमाबांधवांच्या लढय़ाला मराठा संघटनांचे नेहमीच पाठबळ राहिले आहे. आज होणाऱया सीमाबांधवाच्या धरणे सत्याग्रह आंदोलनास सर्वांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले आहे.
सीमाबांधवांच्या लढय़ाला विविध संघटनांचे पाठबळ
कोल्हापुरातील विविध मराठा संघटना, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन, दलित महासंघ, मुख्याध्यापक संघ, माजी महापौर संघटना, मुस्लीम बोर्डिंग पदाधिकारी, शिवाजी विद्यापीठ सेवक संघ, माजी नगरसेवक संघटना, कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्यासह विविध पक्ष-संघटनांनी पाठबळ दिले आहे.