प्रतिनिधी / घुणकी
राष्ट्रीय महामार्गावरुन पुणे-मुंबई सह अन्य राज्यातून कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांचा मार्ग सुकर बनला आहे. आज सकाळी ११ वाजल्यापासून किणी टोल नाक्यावर कोल्हापूर जिल्ह्यासाठी स्वतंत्र तपासणी कक्ष सुरु करण्यात आला आहे. यामुळे पुणे – मुंबईसह अन्य ठिकानाहून कोल्हापूर जिल्हयामध्ये येणाऱ्या परवानाधारक प्रवाशांना होणारा त्रास कमी होईल. मात्र कणेगांव ते टोलनाका दरम्यानच्या किणी-घुणकी या गावातील व अन्य रस्त्याने छुप्या पद्धतीने हे प्रवाशी येण्याचे प्रमाणही वाढले आहे.
कोल्हापूर जिल्हयाच्या हद्दीलगत कणेगांव ( जि. सांगली) येथे प्रशासनाने तपासणी कक्ष गेल्या महिन्याभरापासून सुरू केले आहे. याठिकाणी पुणे-मुंबईसह अन्य ठिकाण हून येणाऱ्या प्रवाशांची व वाहनांची कडक तपासणी केली जाते. यामध्ये वाहण परवाने ‘प्रवाशी व त्यांची आरोग्य तपासणी करुनच त्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जातो. राष्ट्रीय महामार्गावरून होणारी वाहनांची मोठी वर्दळ व प्रवाशी संख्या यामुळे या तपासणी नाक्यावर २४ तास भली मोठी रांग नित्याची होती. प्रवेशासाठी सर्व सोपस्कर पार पडनेस बराच वेळ जात असल्याने या तपासनी नाक्यावर पुणे-मुंबईसह अन्य भागातील रेड झोन मधून आलेल्या प्रवाशांची गर्दी इथे काम करणाऱ्या सर्व यंत्रणांसाठी धोक्याची होती. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमाद्वारे आवाज ऊठवल्यानंतर प्रशासनाने आज किणी टोलनाक्याजवळ कोल्हापूर जिल्हयात प्रवेश करणाऱ्यासाठी स्वतंत्र तपासणी नाका सुरू केला आहे. या तपासणी नाक्यावर अद्यावत पाच बूथ असून प्रवेश करणाऱ्यांचे परवाने, जाण्याचे ठिकाण यासह अन्य आवश्यक बाबी पडताळून त्यांना वैद्यकिय तपासणीसाठी कोल्हापूर येथील सीपीआर, इचलकरंजीतील ‘आयजीएम व गडहिंग्लज येथील शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय तपासणीचे टोकण दिले जाते आहे.
याबाबत आपत्ती व्यवस्थापण समितीचे उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी कोल्हापूर जिल्हयात प्रवेश करणाऱ्या परवाना धारक प्रवाशांच्या सोईसाठी स्वतंत्र तपासणी नाका सुरू केल्याचे सांगितले. यावेळी किणी येथील तपासणी नाक्यावर सुरूवातीपासूनच मोठी गर्दी व वाहनांच्या रांगा लागलेचे चित्र होते. छुप्या रस्त्यांनी लोक कोल्हापूर जिल्हयात येवू नयेत यासाठी छुपे रस्ते बंद करून अथवा बंदोबस्त ठेवणेची गरज आहे.