कोल्हापुरातील सैनिक दरबार हॉलमध्ये झालेल्या संमेलनास शेकडो संत साहित्यिकांची उपस्थिती: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन
कोल्हापूर/प्रतिनिधी
विश्वाची रचना समजून घेणे फारच कठीण आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेकदा आपण स्वतः पुरता विचार करत असतो . विश्व स्वतः पुरते सीमित ठेवतो पण आता आपला दृष्टिकोन व्यापक बनवला पाहिजे आणि हे विश्वची माझे घर आहे असे समजून आपले वैचारिक परिवर्तन केले पाहिजे, असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले.
ते आज कोल्हापुरातील सैनिक दरबार हॉलमध्ये विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
जगातील भाषा संस्कृती वेगळ आहे. पण संपूर्ण विश्वाला जोडून ठेवण्याचे काम भाव करत असते. या भावाचा प्रसार संत परंपरेतील संतांनी केला आहे. जगभरातील संत साहित्याचा धांडोळा आपण घेतला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे सर्व साहित्य हे मानवतावादी साहित्य आहे. जगातील धर्मग्रंथ हे कर्मकांड किंवा अंधश्रद्धेचा पुरस्कार करणारे नव्हते तर ते माणुसकीची शिकवण देणारे होते. म्हणून धर्मग्रंथ हे अंतिम सत्य सांगणारे साहित्य आहे, असे कोश्यारी म्हणाले.
मानवाचे मन असो किंवा समाजातील गोष्टींमध्ये अस्थिरता निर्माण होते तिथे संत साहित्य भक्कम पाया निर्माण करुन देतात. त्यामुळे फार मोठी परंपरा असलेल्या संत साहित्याचा प्रसार करण्याची जबाबदारी आणि कर्तव्य प्रत्येकाचे आहे. संतांनी सांगितलेला विचार हा कधीही काळाच्या मागे पडत नसतो. तंत्रज्ञानाचा उपयोग करा पण संत विचारांची परंपरा कधीही विसरु देऊ नका, असे मत यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केले.