सर्व दुकाने `अनलॉक’ला राज्यशासनाकडून परवानगी मिळेना
व्यापारी दुकाने सुरू करण्यावर ठाम, प्रशासनाकडून संयम बाळगण्याचे आवाहन
बाजारपेठेत प्रशासन, व्यावसायिकांमध्ये आज संघर्षाची चिन्हे
प्रतिनिधी / कोल्हापूर
शहरातील सर्व दुकाने सुरू करण्याबाबत राज्यशासनाकडून रविवारी रात्री उशीरापर्यंत काहीच निर्णय झाला नसल्याने आज, सोमवारपासून पुन्हा व्यापारी, प्रशासन आमने-सामने येण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने संयम बाळगण्याचे आवाहन केले असले तरी व्यापारी दुकाने सुरू करण्यावर ठाम आहेत. यामुळे व्यापारी, प्रशासन संघर्षाची चिन्हे आहेत.
तीन महिन्यांपासून व्यापार बंद असल्यामुळे कोल्हापूर शहरातील व्यापारी दुकाने बंद ठेवण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीत. त्यांनी अक्रमक भूमिका घेतल्यानंतर राज्याशासनाने कोल्हापूर शहरातील पॉझिटीव्हटी रेट 10 टक्केपेक्षा कमी असल्याने प्रायोगिक तत्वावर सर्व दुकाने मागील आठवड्यात पाच दिवसांसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी दुपारी 4 वाजता या निर्णयाची मुदत संपली. शहराचा पॉझिटीव्हटी रेट अद्यपही 10 टक्केपेक्षा कमी असल्याने पुढील काळातही दुकाने सुरू ठेवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, जिल्ह्याचा पॉझिटीव्हटी रेट 10 टक्क्यांवर गेल्याने कोल्हापूर पुन्हा राज्यशासनाच्या नियमानुसार चौथ्या टप्प्यातच राहिल्याने प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शहरासह जिल्ह्यात कडक निर्बंध लावले आहेत. यामुळे सर्व दुकाने बंद झाले आहेत. डॉ. बलकवडे यांनी राज्यशासनाकडे शहरातील कोरोनाची स्थितीचा अहवाल पाठविला आहे. राज्यशासन मागील आठवड्याप्रमाणे पुढील आठवढ्यातही सर्व दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी देईल, अशी अपेक्ष व्यापाऱ्यांची आहे. मात्र, रविवारी रात्री उशीरापर्यंत याचा निर्णय झाला नव्हता.
परवानागी द्या अन्यथा आज व्यापार सुरू – ललित गांधी
मागील आठवड्यामध्ये कोल्हापूर शहरातील सर्व व्यापार सुरू करूनही कोरोना रूग्णांची संख्या वाढली नसून घटलीच आहे. त्यामुळे राज्यशासनाने येथून पुढेही सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी अन्यथा आज, सोमवारी सकाळी सर्व व्यापार सुरू करू, असा इशारा राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिला आहे.
राज्यशासनाने सर्व दुकाने सुरू करण्यास प्रायोगिक तत्वावर दिलेली मुदत शुक्रवारी संपली असून यासंदर्भात पुढील निर्णय घेतलेला नाही. पुढील दिशा ठरविण्यासाठी राजारामपुरी व्यापारी असोसिएशनच्या कार्यकारी मंडळाची तातडीची विशेष बैठक रविवारी सायंकाळी असोसिएशनच्या कार्यालयात झाली.
गांधी म्हणाले, तीन महिन्यांनंतर राज्य शासनाने प्रायोगिक तत्वावर कोल्हापूर शहरातील पाच दिवस दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली. या कालावधीत रूग्णांची संख्या वाढली नाही. त्यामुळे व्यापार सुरू करण्याने संसर्ग वाढत नाही. ही व्यापाऱयांची भूमिका खरी ठरली आहे. त्यामुळे आज, सोमवारी सर्व व्यापार सुरू करण्यास परवानगी मिळालीच पाहिजे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, खासदार धैर्यशील माने आदींकडे याची मागणी केली आहे. सर्व ठिकाणाहून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. परंतु प्रत्यक्षात आदेश अद्याप हातात पडले नाहीत. पुढील निर्णय घेण्यासाठी आज, सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता पुन्हा असोसिएशनच्या कार्यालयात बैठकी आहे.
सराफ दुकाने सुरू करणार
जिल्ह्यातील सर्वच दुकाने 15 दिवस बंद करा, अन्यथा आज, सोमवारपासून सराफ दुकाने सुरू करू, असा इशारा कोल्हापूर सराफ व्यापारी संघाने रविवारी झालेल्या बैठकेत दिला. यावेळी अध्यक्ष कुलदीप गायकवाड, सचिव अनिल पोतदार (हुपरीकर) यांच्यासह संचालक, सभासद उपस्थित होते.
सराफ संघाचे कुलदीप गायकवाड म्हणाले, जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या नावाखाली बाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. केवळ शहर नाही तर ग्रामीण भागातही गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र त्याचा भार पॉझिटिव्हिटी रेट वाढण्यावर होत आहे. अगदी वीकेंड लॉकडाउनचाही पूर्णता फज्जा उडल्याचे दिसते. पॉझिटिव्हिटी रेट कमी करावयाचा असेल तर सगळेच व्यवसाय, उद्योग बंद करा. हॉस्पिटल, मेडिकल आणि दूध सोडून बाकी सर्व बंद करा तरच रेट कमी येईल. असे करावयाचे नसेल तर सराफ व्यावसायिकांसह सर्वच दुकानदार सोमवारपासून सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत दुकाने सुरू करू.
आठ दिवस संयम बाळगा – प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे
जिल्ह्यातील कोरोनाचा पॉझिटीव्हीटी रेट कमी होत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आठ दिवस संयम बाळगावा, दुकाने उघडण्याची घाई करू नये, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
डॉ. बलकवडे म्हणाल्या, कोल्हापूरमध्ये इतर जिल्ह्याच्या तुलनेत कोरोनाची दुसरी लाट उशीरांने आली आहे. त्यामुळे उद्रेक कायम आहे. जिल्हा प्रशासनाकडून साथ आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. शहरासह ग्रामिण भागातही कँटेक्ट टेसींग, अँटीजेन टेस्टची संख्या वाढवली आहे. हॉटस्पॉटमधील कंटेंटमेंट झोनमध्ये विशेष उपाय योजना राबवल्या जात आहेत. आरोग्य विभाग 24 तास राबत आहे. यामुळे साथ लवकरच अटोक्यात येईल, अशी अपेक्षा आहे.
पॉझिटीव्हीटी रेट घटला
मागील महिन्यांत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीट रेट (आरटीपीसीआर) 16 टक्के होता. तपासणीच्या तुलनेत रूग्ण कमी आढळून येत आहेत. मागील आठ दिवसांत 12.2 टक्के असणारा पॉझिटीव्हीटी रेट शनिवारी 11 टक्के इतका झाला आहे. पुढील आठ दिवसात 10 टक्के पेक्षा खाली येऊन जिल्हा चौथ्या टप्प्यातून तिसऱया टप्प्यात येण्याची शक्यात आहे.
शासनाचे नियम पाळावे लागणार
शहरातील पॉझिटीव्हीटी रेटची माहिती राज्यशासनाकडे पाठविली आहे. मागील आठवड्याप्रमाणे याही आठवड्यात कोल्हापूर शहरासाठी शिथिलता देण्याबाबतचा निर्णय रात्री उशीरपर्यंत झालेला नाही. तरी व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेऊन नियम पाळवे.
डॉ. कादंबरी बलकवडे, प्रभारी जिल्हाधिकारी
शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडू
मागील आठवड्यामध्ये शासनाने शहरातील पॉझिटीव्हीट रेट पाहून विशेषबाब म्हणून सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली होती. आताही शहराचा पॉझिटीव्हीट रेट कमीच आहे. पुढील आठवड्यामध्येही सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळावी, यासाठी शासनस्तर प्रयत्न सुरू आहेत. सोमवारी सकाळपर्यंत निर्णय झाला नाही तर आमदार चंद्रकांत जाधव यांच्यासह सर्व पदाधिकारी मुंबईला जाऊन शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडू
संजय शेटे, अध्यक्ष चेबर ऑफ कॉमर्स