प्रतिनिधी/कोल्हापूर
दहा रूपयांत शिवभोजन थाळी योजनेला रविवारी राज्यभर सुरूवात झाली आहे. कोल्हापुरात हॉटेल शिवाज, हॉटेल साईराज, महालक्ष्मी भक्त मंडळ अन्नछत्र आणि रूद्राक्ष महिला बचत गट येथे ही केंद्रे सुरू झाली आहेत. राज्यात प्रायोगिक तत्वावर 50 ठिकाणी शिवभोजन थाळी योजना सुरू झाली आहे. याला मिळणारा प्रतिसाद पाहून ही योजना राज्यभर राबवली जाणार आहे. स्वस्त दरात भोजन देणारी योजना निश्चित यशस्वी होईल, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी व्यक्त केला.
सुभाष रोड, उमा टॉकीज चौक परिसरात रविवारी प्रजासत्ताक दिनी रूद्राक्षी स्वयं सहायता महिला बचत गट संचलित आण्णा रेस्टारंटमध्ये शिवभोजन थाळी केंद्रे सुरू झाले आहे. येथे या योजनेला पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, मनपा आयुक्त डॉ. मल्लिनाथा कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवतिके, बचत गटाच्या अध्यक्षा राजश्री सोलापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री पाटील म्हणाले, शासनाने दहा रूपयांत शिवभोजन थाळी योजना प्रायोगिक तत्वावर राबवली आहे. स्वस्त दरात चांगले भोजन याद्वारे जनतेला मिळणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय चौकातील हॉटेल शिवाज येथे महापौर ऍड. सुरमंजिरी लाटकर यांच्या हस्ते, ताराबाई रोडवर महालक्ष्मी अन्नछत्र येथे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते, साईक्स एक्सटेंशन येथे हॉटेल साईराजमध्ये नाविद मुश्रीफ यांच्या हस्ते शिवभोजन थाळी योजनेचे उद्घाटन झाले. शहर अन्नधान्य वितरण अधिकारी माधवी शिंदे यावेळी उपस्थित होत्या.