प्रतिनिधी / कोल्हापूर
गंगावेश ते पंचगंगा नदी पर्यंतच्या आखरी रस्त्याची दूरवस्था झाली होती. स्थानिक कार्यकर्ते, नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर रस्त्यावर तब्बल सात आठ वर्षांनी डांबर पडले. सोमवारी रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली आणि मंगळवारी चक्क लिकेज काढण्याच्या नावाखाली तयार केलेला नवीन रस्ता खोदण्याचा प्रकार घडला. रस्ता करण्यापूर्वी तेथील पाणी, डेनेज लाईनची तपासणी करणे आवश्यक असताना त्याकडे महापालिकेच्या अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले. तर ठेकेदाराने शहानिशा न करता डांबरीकरण केले. रेगे तिकटी येथे घडलेल्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिक आणि् कार्यकर्त्यांतून संताप व्यक्त होत आहे.
आखरी रस्त्याच्या दूरवस्थेबद्दल स्थानिक नागरिकांसह कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांनी आवाज उठविल्यानंतर तब्बल सात आठ वर्षांनी प्रथम या रस्त्याच्या कामाला निधी मिळाला. याआधी केवळ पॅचवर्कची मलमपट्टी केली जात होती. सोमवारी डांबरीकरणाचा नारळ फुटला. काम सुरू करण्याआधी रस्त्याखालील पाण्याची आणि डेनेजची लाईन व इतर सेवावाहिन्यांची तपासणी करणे गरजेचे होते. हिंदूत्ववादी कार्यकर्ते बंडा साळुंखे यांनी काम सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा सेवावाहिन्यांची तपासणी करा, लिकेज असल्यास तातडीने ती कामे करा आणि नंतर रस्ता करा अशी मागणी केली होती. यावेळी त्यांनी रस्त्याकडेला असणाऱया डेनेज आणि पाण्याची लिकेज व खराब पाईप लाईनही दाखविल्या होत्या. महापालिकेची अधिकारी आणि ठेकदाराने लिकेजसह दुरूस्ती केल्यानंतर डांबरीकरण करण्याचे आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात सोमवारी तातडीने रस्ता करण्यात आला. मंगळवार शहर पाणी पुरवठा विभागाला जाग आली. रेगे तिकटी जवळ नवीन केलेल्या रस्त्याच्या खालील जलवाहिनीला गळती असल्याने ती काढण्यासाठी रस्ता खोदण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जेसीबी आणण्यात आला. रस्ता खोदण्यात आला. रस्ता करून चोवीस तास पूर्ण होण्याआधीच रस्ता खोदल्याने स्थानिक नागरिक, कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. ते बुधवारी महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेणार आहेत.
नुकसान आणि वाया गेलेल्या श्रमाला कोण जबाबदार?
शिवसेनेचे किशोर घाटगे म्हणाले, या प्रकारात झालेले नुकसान आणि वाया गेलेले श्रम यांना कोण जबाबदार. यातून महापालिकेचे अधिकारी कामाविषयी गंभीर नसल्याचे दिसते.
रस्त्याचे काम सुरू करण्याआधी महापालिकेचे अधिकारी व ठेकेदाराला कल्पना देऊनही त्यांनी लिकेज व दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले. त्यांना केवळ कसेही करून काम उरकायचे असल्याचे स्पष्ट झाले.
संभाजी उर्फ बंडा साळुंखे, हिंदूत्ववादी कार्यकर्ते