‘एक जिल्हा एक उत्पादन’ योजनेत समावेश
लहान उद्योजक, बचत गट, शेतकरी गटांना 10 लाखांपर्यंतचे अनुदान
विठ्ठल बिरंजे / कोल्हापूर
‘एक जिल्हा एक उत्पादन’ योजनेत कोल्हापुरी गुळाचा समावेश झाल्याने गुळ उत्पादक शेतकऱयांना सुगीचे दिवस येणार असून या उद्योगाल ‘ग्लोबल’ झेप घेण्याची संधी चालून आली आहे. यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी, बचत गट, लहान उद्योजकांना दहा लाखांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. यातील केंद्र 60 तर राज्य सरकार 40 टक्के हिस्सा उचलणार आहे. कोल्हापुरी गुळाबरोबर पुण्याची टोमॅटो, सांगलीची द्राक्षे, सातारी भुईमूग तर सोलापूरच्या ज्वारीचाही यामध्ये समावेश केला आहे. ही योजना पाच वर्षासाठी असून सरकारने एक हजार कोटींची तरतुद केली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हपूरची गुळ पंढरी अशी ओळख आहे. कोल्हापुरी गुळाची गोडी देशाबाहेरची चाखली जाते. आखाती देशात येथे तयार होणार्या सेंद्रीय गुळाला चांगली मागणी आहे. निर्भेळ आणि टिकाऊ अशी येथील गुळाळी ओळख, मात्र अलिकडच्या काळात कर्नाटकातील साखर मिश्रीत गूळ स्वस्तात मिळू लागल्याने कोल्हापुरी गुळावर मर्यादा आल्या. गुळाचे क्लस्टर व्हावे, सेंद्रीय गूळ तयार करुन जागतीक बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी येथील राजर्षी शाहू गूळ खरेदी विक्री संघ व गूळ संशोधन केंद्राकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत.
आता ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या योजनेतच शासनाने गुळाचा समावेश केल्याने येथील गूळ उत्पादक शेतकर्यांचे ध्येय टप्प्यात आले आहे. नाशवंत मालावर प्रक्रीयेला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ही योजना तयार केली आहे. केंद सरकारच्या प्राईम मिनिस्टर फार्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग या योजनतून कृषी विभागाने प्रस्ताव तयार केला आहे. या योजनेतून शेतकरी उत्पादक कंपन्या, बचत गटांना वैयक्तिक अन्न प्रक्रिया युनिट म्हणून खर्चाच्या 35 टक्के किंवा जास्ती जास्त दहा लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
असा करता येणार अर्ज
शेतकरी उत्पादक गट, बचत गट, वैयक्तिक लाभार्थ्यांनी ‘पीएफएफएमई’ पोर्टलवर अर्ज सादर करावा, प्रस्ताव मान्य झाल्यानंतर केंद्राकडून 60 तर राज्यकडून 40 टक्के अनुदान थेट लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात येते.
दृर्ष्टीक्षेपात कोल्हापुरातील गूळ उद्योग
मुख्य बाजारपेठ शेती उत्पन्न बाजार समिती
चालू गुराळघरं 400
वर्षिक उत्पादन 650 क्विंटल
वार्षिक उलाढाल 225 कोटी
निर्यात आखाती देश
देशाअंतर्गत बाजारपेठ गुजरात (95 टक्के)
गुळासह आजरा घनसाळ, केळी, काजूचाही समावेश शक्य : ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधिक्षक कृषी
कोल्हापूरची भौगोलिक परिस्थितीमुळे डोंगरी तालुक्यात भात, चंदगडला काजू, करवीर, हातकणंगले, कागल, शिरोळला प्रामुख्याने ऊस पिक घेतले जाते. त्यामुळे विशेषबाब म्हणून गुळासोबत आजरा घनसाळ, काजू, केळी यांचाही समावेश होईल असे प्रयत्न सुरु आहेत.