कुर्डुवाडी /प्रतिनिधी
कोल्हापुर ते मुझफ्फरपुर अशी साप्ताहिक किसान रेल शेती माल फळे, भाज्या व मासे यासारख्या नाशवंत वस्तू वाहतुकीसाठी शुक्रवार दि.२१पासून धावणार असल्याची माहिती कुर्डुवाडी रेल्वे स्थानक प्रबंधक रामकिसन चौधरी यांनी दिली. या गाडीला पाच व्ही. पी. यु. सह एक ब्रेक व्हॅन असणार आहे. पुढे दौंड स्थानकातून या गाडीला आणखी एक व्ही.पी.यु जोडला जाणार आहे.
ही गाडी सप्ताहातील शुक्रवारी धावणार असून याची सुरुवात दि. २१ रोजीच्या शुक्रवारी होणार आहे. या गाडीचा क्रमांक जाताना ००१०९ व परत येताना गाडी क्रमांक ००११० असा असणार आहे. शुक्रवार दि.२१ रोजी ही गाडी कोल्हापुरहून पहाटे ५.३० वा. निघणार असून मिरज, सांगोला,पंढरपुर, कुर्डुवाडी, दौंड,अहमदनगर, मनमाड या ठिकाणी थांबत रविवारी पहाटे ४ .४५ वा मुझफ्फरपुर येथे पोहचणार असून त्याच दिवशी परत फिरणार आहे. रविवारी सकाळी ८ वा. मुझफ्फरपुरहून निघून मंगळवारी सकाळी ८.३० वा कोल्हापुरला पोहचणार आहे.
शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी आपला शेती माल या गाडीमधून वाहून नेण्यासाठी आपल्या नजीकच्या रेल्वे स्थानक प्रबंधकाशी संपर्क साधावा व याचा लाभ घ्यावा असे आवाहन स्थानक प्रबंधक रामकिसन चौधरी यांनी केले.
*अशी धावणार किसान रेल*
कोल्हापुर -मुझफ्फरपुर (गाडी क्र.००१०९) ही कोल्हापुरहून पहाटे ५.३० वा. निघाल्यानंतर मिरज येथे सकाळी ६ .३० मि. ,सांगोला येथे सकाळी ८.३०मि.,पंढरपुर येथे सकाळी ९.५५ मि., कुर्डुवाडी येथे सकाळी ११.१५ मि., दौंड येथे दु. १.४५ मि., अहमदनगर येथे दु.३.३५ मि.,मनमाड येथे सं.६.२५ मि., तर मझफ्फरपुर येथे रविवारी पहाटे ४.४५ मि.पोहचणार आहे.
परतीच्या प्रवासात मुझफ्फरपुर – कोल्हापुर (गाडी क्र ००११०) ही गाडी रविवारी सकाळी ८ वा. मुझफ्फरपुर येथून निघून सोमवारी रात्री ८ वा. मनमाड येथे पोहचणार आहे.त्याच दिवशी अहमदनगर येथे रात्री १०.२० मि.,दौंड येथे मंगळवारी रात्री १२.२० मि.,कुर्डुवाडी येथे रा.२.४० मि, पंढरपुर येथे पहाटे ४.२० मि., सांगोला येथे पहाटे ५.०५ मि, मिरज येथे सकाळी ६.५० मि. तर कोल्हापुर येथे सकाळी ८.३० मि.पोहचेल.