प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. सध्या 400 ऑक्सिजेनेटेड बेड व 300 आयसीयु बेडची आवश्यकता आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाऱयांनी पाठविला असून विनाविलंब तो राज्य सरकारने मंजूर करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी ते सध्या कोल्हापूर, सांगली, सातारा दौऱयावर आहेत. शुक्रवारी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन जिह्यातील कोरोना स्थितीचा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडून आढावा घेतला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, महापालिका विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी, नगरसेवक अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, ’सीपीआर’ मध्ये बसविलेली ऑक्सिजन टँक ही बाब सकारात्मक आहे. कोल्हापुरातील कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून परिस्थिती गंभीर आहे. प्रामुख्याने कोरोना रुग्णदर 20 टक्केच्या आसपास पोहोचला आहे. गेल्या आठ दिवसातील प्रमाण पाहता तो 25 ते 30 टक्केपर्यंत पोहोचला आहे. हे प्रमाण जास्त असून यावरून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात सध्या आरटीपीसीआर चाचण्या 1700 ते 1800 इतक्या आहेत. हे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. त्यासोबत रॅपिड अँटिजेन टेस्ट केल्यास लवकर निदान करून त्यातून संसर्गदर कमी करता येईल. त्यादृष्टीने अशा चाचण्यांची याठिकाणी आवश्यकता आहे. जिल्हा प्रशासनाने केलेली कोविड सेंटरची व्यवस्था अतिशय चांगली आहे. परंतू त्यासाठी मोठय़ा प्रमाणात आयसीयु बेडची व्यवस्था येथे करावी लागणार आहे. जिल्हाधिकारी देसाई यांनी जिल्हासाठी 400 ऑक्सिजेनेटेड बेड, 300 आयसीयु बेड मिळावेत असा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला आहे. सरकारने तो तत्काळ मंजूर करावा, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्यावर उपचार करून त्यांना बरे करता येईल. तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या माध्यमातून प्रादुर्भाव रोखला जाऊ शकतो. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन त्यांना याबाबत माहिती देऊ, असे फडणवीस यांनी सांगितले.