कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
महापालिकेतील बैठकीतील चर्चेनंतर महापौरांचे आवाहन
11 ते 21 सप्टेंबर पर्यंत जनतेने बंद पाळण्याची विनंती
प्रशासनाकडून कोणतेही निर्बंध नाहीत
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर शहरात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी स्वतःपुढे येऊन 11 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून ते 21 सप्टेंबर पर्यंत स्यंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळावा असे आवाहन महापौर निलोफर आजरेकर यांनी केली. कोल्हापूर शहरात ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्यासंर्भात चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या संयुक्त बैठकीनंतर महापौरांनी ‘जनता कर्फ्यू’बाबत आवाहन केले.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आज महापालिकेत महापौर निलोफर आजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली जनता कर्फ्यू घोषित करण्याबाबत सर्व पक्षीय आणि संघटना मनपा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी महापौर निलोफर आजरेकर यांनी कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे प्रशासन युद्ध पातळीवर उपाययोजना करत आहे. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, मास्कचा वापर न करणे, रुग्णाबाबत माहिती न देणे असे प्रकार होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.यावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वयंसपूर्तीने जनता कर्फ्यूच्या निर्णयास सहकार्य करावे. पण नागरिकांवर कोणतेही निर्बंध असणार नाहीत असे स्पष्ट केले.
जिल्हा पोलिस प्रमुख डॉ अभिनव देशमुख म्हणाले, कोरोनाचा सामना करण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. मोठा लॉक डाऊन करण्याची सध्या परिस्थिती नाही. त्यापेक्षा नियमाचे पालन, मास्कचा वापर करणे मह्त्वाचे आहे. कंटेन्मेन्ट झोनमध्ये कडक नियम करण्याची गरज आहे. महामारीचे संकट आहे ही मानसिकता बदलून आजार म्हणून सामोरे गेले पाहिजे. प्रबोधनातून यावर नियंत्रण मिळवणे शक्य होईल. लोकांच्या मनातील भीती आहे ती काढून टाकली पाहिजे. तर नियमांचे पालन करत नाहीत आणि सामाजिक उपद्रव करतात त्यांच्यावर कारवाई करणे गरजेच आहे. व्यापाऱयांनी स्वतः नियम मोडणार्या व्यापार्यांवर कारवाई करावी.
या बैठकीत प्रारंभी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी भाजी मार्केटमध्ये गर्दी टाळणे गरजेचे आहे. गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. हा कालावधी पीक पिरियड आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी कॉमन मॅन संघटनेचे बाबा इंदुलकर यांनी जनता कर्फ्युला कॉमन मॅन संघटनेचा विरोध असल्याचे सांगितले. लॉकडाऊन हा उपाय नाही, यामुळे हा रोग थांबणार नाही. सरकारी कर्मचार्यांचे पगार झाले मात्र असंघटीत मजूर कामगारांचे काय, त्यांनी काय सोसले हे माहीत आहे का असा प्रश्न उपस्थित केला. दहा दिवसांचा जनता कर्फ्यू करण्यापूर्वी प्रथम त्याची कारणे पटवून द्या असे आवाहन केले.
माजी महापौर आर के पोवार म्हणाले, सद्या कोरोनाचा संसर्ग मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत.यामुळे लोक कसे वाचतील यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. दहा दिवसांचा जनता कर्फ्यु ठेवला पाहिजे. जनतेने नियमांचे पालन केले पाहिजे.बाबा पार्टे यांनी जनता कर्फ्यु करण्याचे काय नियोजन केले आहे का अशी विचारणा केली. असंघटित कामगार मजूर यांना मदत करणार का असा प्रश्न उपस्थित केला.
दिलीप देसाई म्हणाले, लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. प्रशासनातील सर्व कर्मचाऱयांचे पगार चालू आहेत. मात्र सामान्यांचे काय अशी विचारणा केली. सद्य परिस्थिती पाहता कोणत्याही परिस्थितीत लॉक डाऊन करु नये. जर लॉक डाऊन केले विरोधात आंदोलन करू असा इशारा दिला. अशोक पोवार यांनी लॉकडाऊन करण्याचे समर्थन करत प्रशासनाच्या कामाची प्रशंसा केली. नागरिकांनी स्वतःवर निर्बंध घालून लॉकडाऊनसाठी प्रशासनाला सहकार्य करावे. सफाई कामगारांचे फुले टाकून स्वागत करण्यापेक्षा घरात बसावे, व्यापाऱयांनी त्यांची दुकाने वेळेत बंद करावीत असे स्पष्ट केले. वकील संघटना
सीपीआरच्या समोरची न्यायालायची इमारत कोव्हीड सेंटरसाठी देण्यास विरोध करत आहेत. न्याय आणि विधी खात्याने ताबडतोब ही इमारत कोविड सेंटरसाठी उपलबध करुन द्यावी. समीर नदाफ यांनी कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यापासून गोर गरिबांच्या चुली पेटल्या नाहीत. जनता कर्फ्यु असे नाव न देता प्रशासनाचा कर्फ्यू जाहील करावा अशी सूचना केली. यावेळी कादर मलबारी यांनी जनता कर्फ्युला आमचा विरोध राहील मात्र प्रशासनाच्या नियमांचे पालन करू अस सांगितले.
माजी नगरसेवक दिलीप शेटे म्हणाले, जनता कर्फ्युची घोषणा करायची नाही की प्रशासक म्हणून निर्णय घ्यावा. समूह संसर्ग कमी होण्यासाठी गर्दीवर नियंत्रण आणावे अशी सूचना केली. चेंबर ऑफ कोमर्सचे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, व्यापाऱयांच्या विनंतीनुसार बैठक घेऊन कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कडक बंद झाला तर लॉक डाऊन करावे. शहरातील सर्व नाके पूर्णपणे बंद केले पाहिजेत. व्यापार्यांच्या बैठकीत 11 ते 16 सप्टेंबर या कालावधीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय झाला आहे. शहरातील लॉकडाऊनबरोबर गांधीनगर बाजारपेठ सुध्दा बंद ठेवावी अशी विनंती केली असल्याचे सांगितले.
यावेळी रमेश मोरे यांनी आक्षेप घेत बंद ठेवायचे असेल तर व्यापार उद्योगासह पंच तारांकित एमआयडीसी, बँकाही बंद ठेवाव्यात अन्यथा लॉकडाऊनला विरोध असल्याचे सांगितले.
यावेळी गटनेते शारंगधर देशमुख म्हणाले, प्रत्येक व्यक्तीने स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यावी. सर्वानुमते निर्णय घेण्याची गरज आहे. जनता कर्फ्युचा निर्णय स्वतः जनतेने घ्यावा. कोणावरही सक्ती नसल्याचे स्पष्ट केले. विरोधी पक्षनेता विजय सूर्यवंशी म्हणाले लॉकडाऊन करताना 13 सप्टेंबर रोजी नीटची परीक्षा आहे.यामुळे परीक्षेसाठी येणार्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये याचा विचार व्हावा.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, ऐंशी टक्के लोकांचा लॉक डाऊनला विरोध आहे. बँकांचे कर्ज, व्याज यावर नियंत्रण नाही. लोकांचे प्राण वाचावण्यासाठी प्रयत्न करावेत. महापालिकेने विभागानुसार नागरिकांची मदत घ्यावी. प्रशासन घेईल त्या निर्णयाला समर्थन देवूया. या बैठकीला उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सचिन पाटील,ताराराणी आघाडीचे गटनेता सत्यजित कदम, भाजपाचे गटनेता अजित ठाणेकर, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, राजसिंह शेळके, शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कटे, पोलिस निरीक्षक अनिल गुजर, शशिराज पाटोळे यांच्यासह अन्य नगरसेवक, व्यापारी, नागरिक उपस्थित होते.
बैठकीत शाब्दिक चकमक
जनता कर्फ्यू लागू करण्यासंदर्भात आयोजित केलेल्या या बैठकीत मतभेद दिसून आले. काही लोकांनी जनता कफ्यूचे स्वागत केले. तर काहींनी आधीच सहा महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे प्रचंड हाल झाले आहेत.यामुळे पुन्हा लॉकडाऊन करायचे असेल तर प्रथम गरीब लोकांची सोय करावी अन्यथा लॉकडाऊनला स्पष्ट विरोध दर्शवला. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी जनता कर्फ्यूला स्वयंस्फूर्तीने साथ द्या. निर्बंध नसतील पण काटेकोरपणे नियम पाळा– महापौर निलोफरआजरेकर
सध्याच्या कालावधी पीक पिरियड आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण गरजेचे आहे. आणि त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत – आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी
नियम न पाळणारे व सामाजिक उपद्रव निर्माण करणाऱयांवर कारवाई झाली पाहिजे. व्यापारी संघटनांनी स्वतः नियम मोडणाऱया व्यापाऱयांवर कारवाई करावी – जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख