प्रतिनिधी / कोल्हापूर
‘मोरया’चा गजर, वाद्यांचा दणदणाट अशा वातावरणाला फाटा देत यंदा शनिवारी गणपती बाप्पांचे घरोघरी आगमन होत आहे. कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या उपाययोजनांना गणेशभक्तांकडून प्रतिसाद दिला जात आहे. गेली दोन दिवस त्यातूनच अनेकांनी दोन दिवस अगोदरच गणेशमुर्ती घरी नेल्या. शुक्रवारी सायंकाळी काहींच्या घरात दीड दिवसांच्या बाप्पांचे आगमन झाले. शहर आणि परिसरातील कुंभार गल्ल्यांत गणेशमुर्तीचे स्टॉल आहेत. शनिवारी, गणेश चतुर्थीला मात्र गणेशभक्तांची गर्दी होणार आहे.
प्रतिवर्षी शहरातील गंगावेश, पापाची तिकटी, दत्त गल्ली, लक्ष्मी गल्ली, धोत्री गल्ली, शाहूपुरीतील कुंभार गल्ल्या, संत गोरा कुंभार वसाहत आणि अनेक उपनगरात गणेशोत्सवाच्या पुर्वसंध्येला स्टॉल लागतात. गणेशमुर्तीसह पुजेच्या साहित्याने हा परिसर फुलून जातो. यंदा मात्र कोरोनामुळे यावर मर्यादा आली आहे. गणेशमुर्तीचे स्टॉल असले तरी गणेशभक्तांना मुर्ती नेताना दोघांनाच येता येणार आहे. कुंभार गल्लीतून मुर्ती बाहेर पडल्यानंतर अन्य कुटुंबियांसह ती बाप्पा च्या गजरात घरी नेली जाणार आहे. काहीनी दोन दिवस आधी गणेशमुर्ती घरी नेली आहे. बुकींग झालेल्या गणेशमुर्ती चतुर्थीला घरोघरी नेल्या जाणार आहेत.
शनिवारी घरोघरी गणेशाचे आगमन होणार आहे. गणेशाच्या स्वागतासाठी लागणारे पुजेचे साहित्यासाठी बाजारपेठांत दिवसभर गर्दी होती. सजावटीचे साहित्य, मोदक, फळांच्या खरेदीसाठीही गर्दी झाली होती. शनिवारी मात्र कुंभार गल्ल्या गणेशभक्तांनी फुलून जाणार आहेत. वाद्यांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत घरोघरी बाप्पांचे आगमन होणार आहे.
गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे, गणेशमुर्तीच्या उंचीवर मर्यादा आली आहे. काही मंडळांनी शुक्रवारीच गणेशमुर्ती नेल्या. काही मंडळे शनिवारी मूर्ती नेणार आहेत. मंडळांच्या गणेशमुर्ती नेण्यासाठी शनिवारी कुंभार गल्ल्यांत गर्दी होणार आहे. त्यासाठी पोलिसांनी वाहतुकीचे नियोजनही केलें आहे. तसेच कार्यकत्यांनाही सोशल डिस्टन्स राखण्याचे आवाहन केले आहे. कमीत कमी वाद्यांच्या वापर करत, साधेपणाने गणेशमुर्तीची मिरवणूक काढावी, तिची प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्याला मंडळांकडून प्रतिसाद मिळत आहे.
गणेशमुर्तीची प्रतिष्ठापनेसाठी मुहूर्त
शनिवारी, 22 रोजी गणेश चतुर्थी आहे. सकाळी 8 ते 9 वाजेपर्यत आणि 11 ते सायंकाळी 5.15 वाजेपर्यत गणेशमुर्ती आणण्यासाठी प्रतिष्ठापनेसाठी शुभ मुहुर्त आहे. प्रतिष्ठापना करताना प्रथम लाल फुल वाहावे, सुंगंधी फुले दुर्वा वहाव्या. नंतर उपलब्ध पत्री वहाव्यात, गणेशाला मधुमालती, माका, बेल, पांढरी दुर्वा, बोरी, धोतरा, शमी, आघाडा, कण्हेर, रूई, अर्जुनपत्र, विष्णुकांत डाळींब, देवदार, मारवा, पिंपळ, जाई, केवडा, अगस्ती अन् अखेरीस तुळसीपत्र वाहावे, असे आवाहन निपाणी येथील दत्तात्रय जोशी यांनी केले आहे.
गौरीआवाहनमुहुर्त
मंगळवारी 25 रोजी दुपारी 2 ते 3 आणि सायंकाळी 5.32 ते रात्री 8.15 वाजेपर्यत आहे. बुधवारी, 26 रोजी गंगा आणण्याचा मुहुर्त पहाटे 6.20 ते सकाळी 9.27 पर्यत आणि 11 ते दुपारी 12 वाजेपर्यत आहे, अशी माहितीही दत्तात्रय जोशी यांनी दिली.