प्रतिनिधी / शिरोळ
येथील आंदोलन अंकुशच्या वतीने महावितरण कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन सादर केले.
भरमसाठ आलेले घरगुती वीजबिले त्वरित माफ करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. शासनाचा जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत वीज कनेक्शन तोडू देणार नाही असा इशाराही आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमूगे यांनी दिला.
शिवाजी चौकातून दुपारी एक वाजता बैलगाडी मोर्चा सुरुवात झाली. हा मोर्चा महावितरण कार्यालय आल्यानंतर त्याचे रूपांतर सभेत झाले. यावेळी बोलताना धनाजी चुडमूगे म्हणाले की, गेली दोन वर्षे शिरोळ तालुक्यामध्ये महापूर, कोरोना यामुळे सर्वच घटकांचे आर्थिक नुकसान झाले त्यातच महावितरण अव्वाच्या सव्वा बिले दिल्याने नागरिक मेटाकुटीस आले आहेत. शासनाने वीज बिले माफ करण्याची घोषणा केली होती. त्यावर त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.