प्रतिनिधी / कोल्हापूर :
आज कोल्हापूरात जिल्हाधिकारी कार्यालयात मा. जिल्हाधिकारी डॉ. दौलत देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत महापुराने बाधित ऊस शेत्राच्या तोडणीबाबत आढावा बैठक झाली. सदर बैठकीस कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक उपस्थित होते. यावेळी माननीय जिल्हाधिकारी यांनी कोणत्याही परिस्थितीत येत्या सात आठ दिवसात महापुरामुळे बाधित कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण ऊस तोडण्यासाठी साखर कारखान्यांनी युद्धपातळीवर यंत्रणा राबवावी असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. दौलत देसाई यांनी दिले. यावेळी अरुण काकडे हे उपस्थित होते. बैठकीस इरिगेशन फेडरेशनच्यावतीने प्रा. डॉ एन. डी. पाटील, बाबासाहेब पाटील–भुयेकर, विक्रांत पाटील–किणीकर, चंद्रकांत पाटील–पाडळीकर, आर के. पाटील, बाबासाहेब देवकर, सागर पाटील, आनंदा कदम, शिवाजीराव माने, मारुती पाटील यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी देसाई यांनी अरुण काकडे यांना आपण यामध्ये जातीने लक्ष घालून आपल्या खात्याचे सक्षम अधिकारी यांचे प्रत्येक साखर कारखाना वाईज नेमणूक करून गावावर पूर बाधित शेतकऱ्यांची यादी काढून त्यांचा ऊस तुटला आहे किंवा काय याबाबतची खात्री करावी तसेच, जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडून पूर बाधित शेतकर्यांना ऊसाची माहिती घ्यावी असेही सांगितले.