शासकीय व खासगी मालमत्तेच्या नुकसान, प्रकरणी आंदोलकांना जिल्हा प्रशासनाचे पत्र, नुकसानीची रक्कम भरल्यानंतरच गुन्हे घेणार मागे
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जनतेच्या एकजुटीने शहरांतर्गत रस्त्यांसाठी लादलेल्या टोलला परतवून लावले होते. मात्र राज्यभर गाजलेल्या टोल आंदोलनप्रश्नी आंदोलकांवर दाखल केलेल्या गुह्यांची टांगती तलवार अद्यापही आंदोलकांवर आहे. जिल्हा प्रशासनाने टोल आंदोलकांना नुकसान भरपाईची रक्कम भरा, मगच गुन्हे मागे घेतो, अशा आशयाची पत्रे पाठवली आहेत. एकिकडे गुन्हे मागे घेत असल्याचे सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे वसुलीची पत्रे पाठवली जात आहेत. यामुळे टोल आंदोलकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
शहरांतर्गत रस्त्यांसाठी कोल्हापूर शहरामध्ये आय. आर. बी. कंपनीच्या वतीने टोल वसुली सुरु करण्यात आली होती. मात्र जनतेच्या रेटÎाने ही वसुली हाणून पाडली. टोल विरोधात कोल्हापुरी जनतेच्या रोषात शहरातील 9 टोल नाके जमीनदोस्त झाली होती. यानंतर सरकारने टोल वसुलीस तात्पुरती स्थगिती दिली होती. भाजप सरकारने आय. आर. बी. कंपनीची रक्कम दिली होती. 1 नोव्हेंबर 2015 पूर्वी दाखल झालेले टोलसह इतर सामाजीक व राजकीय आंदोलनामधील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला होता.
कोल्हापूर टोल आंदोलनदरम्यान टोल नाक्याची मोडतोड, जाळपोळ केल्याप्रकरणी काही कार्यकर्त्यांवर जिह्यातील 30 पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केले होते. यानंतर राज्य शासनाच्या आदेशानुसार गुन्हे मागे घेण्यासाठी जिल्हास्तरावर समिती नेमली होती. याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तर सचिव म्हणून अपर पोलीस अधीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. टोल आंदोलनासह जिह्यातील 30 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील पोलीस केस, पंचनाम्यांचा आधार घेऊन प्रशासनाने काही प्रकरणे निकाली काढली आहेत. तर काहीप्रकरणी आंदोलकांवर नुकसान भरपाईची रक्कम निश्चीत केली आहे. शहरातील 8 ते 10 कार्यकर्त्यांना वसुलीची पत्रे प्राप्त झाली आहेत. 20 हजार रुपयापासून 1 लाख रुपयापर्यंतची रक्कम प्रत्येक आंदोलकाच्या नावावर निश्चीत करण्यात आली आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर आंदोलकांना पैसे भरण्याच्या नोटीस प्राप्त झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. पैसे भरायचे की नाही याबाबत चर्चा सुरु आहे. पैसे भरले तर गुन्हा सिद्ध झाला असा समज कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.
पैसे भरले म्हणजे गुन्हा नव्हे
आंदोलकांना देण्यात आलेल्या पत्रामध्ये पैसे भरले याचा अर्थ गुन्हा सिद्ध झाला किंवा मान्य झाला असा अर्थ लावण्यात येऊ नये, असे नमूद करण्यात आले आहे. मात्र जर संबंधित आंदोलकावर निश्चीत केलेल्या रकमेची भरपाई त्याच्याकडून वसूल केली म्हणजेच त्याने हा गुन्हा केला किंवा त्याला हा गुन्हा मान्य आहे, असा याचा अर्थ होतो काय, असा संभ्रम आंदोलकांमध्ये निर्माण झाला आहे.
आयआरबीचे अन्यायकारक भूत कोल्हापूरकरांच्या मानगुटीवर होते. भाजप सरकारने आय. आर. बी.चे पैसे भागवले आहेत. त्यामुळे आंदोलकांनी पैसे भरण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. कोल्हापूरच्या जनतेवर झालेल्या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन केले होते. प्रसंगी कोल्हापूरसाठी शिक्षा भोगण्यास तयार आहे. मात्र, कोणत्याही परिस्थीतीमध्ये पैसे भरणार नाही. ऍड. बाबा इंदूलकर