प्रतिनिधी/कोल्हापूर
शेतीच्या वादातून करवीर तालूक्यातील आरळे गावात शनिवारी (दि.२८) वादावादी झाली होती. या मारामारीत भगवान पाटील याने नामदेव पाटील यांच्या डोक्यात दगड घातल्याने ते गंभीर जखमी झाले होते. तसेच हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या संदीप पाटील यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली होती. संदीप पाटील यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार २९ मार्च रोजी भगवान पाटील यांना अटक करण्यात आली. सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याला न्यायालयासमोर उभे करण्यात आले. न्यायालयाने त्याला १३ एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
याबाबतची माहिती अशी की, फिर्यादी संदिप पाटील, जखमी नामदेव नारायण पाटील (वय -४०, रा. कसबा आरळे, ता. करवीर) व संशयीत आरोपी भगवान रघुनाथ पाटील ( वय -४५, रा. कसबा आरळे, ता. करवीर) हे एकमेकांचे नातेवाईक असून त्यांच्यात वडिलोपार्जीत शेतजमीनींच्या आणेवारी वाटणीच्या करणावरून वाद आहे. शनिवारी (दि.२८) सायंकाळी ४ वाजता गावातील दसरा चौकामध्ये संशयित भगवान पाटील याने संदिप पाटील यांच्या वडीलांना व नामदेव पाटील यांना शेतीच्या वाटणीच्या कारणावरून शिवीगाळ केली. त्यावेळी नामदेव पाटील हे भगवान याला समजावून सांगत असताना भगवान याने नामदेव याच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले. ते रस्त्यावर खाली पडल्यामुळे त्यांना सावरण्याकरीता पुढे आलेल्या संदिप पाटील यांनाही भगवान पाटील याने शिवीगाळ केल्यामुळे संदिप पाटील यांनी तक्रार दिल्याने भगवान पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरिक्षक अभिजीत भोसले करीत आहोत.