अमृत महोत्सवी लोगोचे प्रकाशन
पहिल्या पिढीतील उद्योजकांच्या योगदानामुळेच उद्यमनगरीचे वटवृक्षांत रूपांतर : सचिन मेनन
प्रतिनिधी / कोल्हापूर :
कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन बुधवारी (दि.7) 75 व्या वर्षात पर्दापण करत आहे. अमृत महोत्सवी वर्षाच्या प्रारंभी संस्थेने अमृत महोत्सवी लोगो तयार केला असून रविवारी ज्येष्ठ उद्योगपती बाबाभाई वसा यांचे हस्ते त्याचे प्रकाशन झाले. कोरोना नियमांचे पालन करून केवळ संचालक मंडळ सदस्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, असोसिएशनचे अध्यक्ष सचिन मेनन, ज्येष्ठ उद्योजक श्रीकांत देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
असोसिएशनचे अध्यक्ष सचिन मेनन म्हणाले, स्वातंत्रपूर्व काळात उद्योजकांसाठी संस्था सुरू करणे आणि उद्योजकांना एकत्रित करून चांगले व्यासपीठ तयार करणे हे मोठे आव्हान होते. पहिल्या पिढीतील उद्योजकांनी तांत्रिक ज्ञान नसतानाही बुध्दीमत्तेच्या जोरावर एक उद्ष्टि ठेवून काम केल्यामुळेच उद्यमनगरीचे वटवृक्ष झाले आहे. जुन्या लोकांचे हे कार्य सर्वांना सांगितला पाहिजे. त्यातून नवीन उद्योजकांना एक उत्साह, प्रेरणा आणि संकट काळात ठेवायचा संयमही शिकविते.
बाबाभाई वसा म्हणाले, स्वातंत्रपूर्वीचा आणि नंतरचा काळही खुप आव्हानात्मक होता. परंतु येथील जिद्दी आणि कष्टाळू उद्योजकांमुळे अनेक समस्यावर मात करीत उद्योग सुरू ठेवले. जुन्या पिढीतील उद्योजकांनी जागा मिळवून तेथे उद्योग सुरू होण्यासाठी अथक परिश्रम केले. दिवंगत एस.ए.पाटील आणि श्री.वाय.पी.पोवार यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही. एस.ए.पाटील यांनी तर त्यांच्याकडील दागिने गहान ठेवून उद्योजकांच्या प्लॉटचे पैसे संस्थानकडे भरले. त्यानंतर खय्रा अर्थाने येथील उद्योगांचा प्रवास सुरू झाला. अशा उद्योजकांच्यामुळेच ही मातृ संस्था उभा राहीली. गेल्या 74 वर्षात अनेक चढउतार पाहिले. नवनवीन तंत्र येवू घातले आहे. या काळातही संस्था चांगले कामकाज करित आहे. इतिहासाचा अभ्यासकरून यापुढील कार्यही असेच सुरू ठेवून नविन उद्योजकांना प्रोत्साहीत करा, असे आवाहनही त्यांनी संचालकांना केले.
आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले, संस्थेतील संचालक उत्कृष्ट दर्जाचे काम करतात. उद्योग विकास करण्यासाठी धडपडतात. अनेक संकटांना सामोरे जात त्याचे निराकरण करतात. यामुळेच असोसिएशन प्रगतीपथावर राहिली आहे. जुन्या लोकांनी व्हीजन ठेवून कामकाज केले. त्यामुळेच राजकोट आणि आग्रामधील उद्योजकही येथील उत्पादने घेवून जातात. यावेळी संचालक .श्रीकांत दुधाणे, ज्येष्ठ उद्योजक श्रीकांत देसाई, प्रकाश चरणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी हर्षद दलाल, प्रसन्न तेरदाळकर, कमलाकांत कुलकर्णी, रणजीत शाह, संजय अंगडी, नितीन वडीकर, बाबासो कोंडेकर, अतुल आरवाडे, अमर करांडे, जयदिप मांगोरे, अभिषेक सावेकर, सोहन शिरगांवकर, प्रकाश चरणे, श्रीकांत देसाई, प्रदीप व्हरांबळे उपस्थित होते.
शाहूंच्यामुळेच उद्यमनगारी उभी राहिली
राजर्षी शाहू महाराज यांनी 42 एकर जागा उपलब्ध करून उद्योगांना प्रोत्साहीत केले. यामुळे ही उद्यमनगरी उभी राहीली, उद्योजकांना कामे मिळाली, कामगारांना रोजगार मिळाला. या संस्थेच्या सहकार्याने कोल्हापूर उद्यम सोसायाटी, कोल्हापूर चेंबर, केआयटी कॉलेज, आणि इतर संस्थाचा जन्म झाला. कोरोना अटोक्यात आल्यानंतर अमृत महोत्सवी वर्षा निमित्त चांगले उपक्रम राबवू, मोठे उद्योगपतींना आमंत्रित करून येथील उद्योजकांना चांगले मार्गदर्शन घडवू असे मानद सचिव दिनेश बुधले सांगितले.
मेकॅनिकल इंजिनिअरींगचे रूपांतर कोल्हापूर इंजिनिअरींगमध्ये
स्वातंत्रपूर्व काळात म्हणजे 1947 मध्ये दि कोल्हापूर मेकॅनिकल इंजिनिअरिंग वर्कर्स शॉप ओनर्स युनियन स्थापन झाली. कोल्हापूरातील सर्वात पहिली स्थापन झालेल्या या संस्थेचे 1963 मध्ये नाव बदलून कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन करण्यात आले.