राजेंद्र होळकर / कोल्हापूर
रुकडी-चिंचवाड दरम्यान पंचगंगा नदीवर केंद्र सरकारच्या केंद्रीय रस्ते निधीतून (सीआरएफ) उभारण्यात येणाऱया नवीन पुलाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच पुलाचे काम पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे कोल्हापूर-इचलकरंजी ही दोन शहरे आणखीन जवळ येणार आहेत. सुमारे 9 किलोमीटर अंतर कमी होणार आहे. त्याचबरोबर या पुलामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैशांची बचत होणार आहे.
या पुलाने गांधीनगर कापडाची बाजारपेठ थेट इचलकरंजीच्या वस्त्रनगरीशी जोडली जाणार आहे. त्याचबरोबर कोल्हापूर-सांगली मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. सध्या या नवीन पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी रुकडी येथे पंचगंगा नदीवर पूल बांधण्यासाठी विधानसभेत अनेकदा तारांकित आणि लक्षवेधी प्रश्न मांडून आवाज उठविला होता. त्यानंतर 2014 साली सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेना युतीच्या सरकारावेळी हाळवणकर यांनी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे या पुलाचा प्रस्ताव पाठविला. पाटील यांनी हा पूल सीआरएफ निधीतून प्राधान्याने करण्याबाबत केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे हा प्रस्ताव पाठवला. या प्रस्तावाला त्यांनी तत्काळ मंजुरी दिली. त्यानंतर या पुलाच्या कामाला सुरुवात झाली. पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या काही दिवसात काम पूर्ण होणार आहे.
दोन तालुक्यातील अनेक गावात दळणवळण
रुकडी-चिंचवाड दरम्यान पंचगंगा नदीवरील नवीन पुलामुळे गांधीनगरच्या कापड बाजारपेठेला अच्छे दिन येणार आहेत. त्याचबरोबर हातकणंगले व करवीर या दोन तालुक्यातील अनेक गावात दळणवळण सुरु होणार आहे.
माजी आमदार हाळवणकर यांचा पाठपुरावा
माजी आमदार हाळवणकर यांनी 2009 साली या पुलाची मागणी करुन मंजुरीसाठी पाठपुरावा सुरु केला. त्यांनी तब्बल पाच वर्षे पाठपुरावा करुन केंद्र सरकारकडून या पुलाला मंजुरी व निधी खेचून आणला. या पुलाच्या कामाला सुरुवात केली. येत्या काही दिवसात या पुलाचे काम पूर्ण होऊन पुलावरुन वाहतूक सुरु होणार आहे.