कुठलाही प्रवाशी बसतो कोठेही, नियंत्रणाचा आभाव
सागर लोहार / व्हनाळी
एसटी बसमधील विशिष्ठ व्यक्तींसाठी दिल्या जाणाऱ्या ‘आरक्षित जागा’ केवळ नावापुरत्या उरल्या असून आता केवळ फार्सच असल्याचे सिध्दच झाले आहे. राखीव च्या नावाखाली ठेवण्यात आलेल्या जागेवर क्वचितच ती व्यक्ती बसलेली दिसते. महिला, अपंग आणि वयोवृध्द यांचे हाल तर एस.टी प्रवासात पाचवीलाच पुजलेले आहेत. इतर आरक्षित जागांचेही तसेच आहे.वाहकही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षच करतात.जर अंमलबजावणी होत नसेल तर तर आरक्षणचा आटापिटा हवाच कशाला ? असा प्रश्न साहजिकच विचारला जावू लागला आहे.
विद्यार्थ्यांसाठी,नोकरी करणाऱ्यांसाठी आणि वृध्दांसाठी एस.टी. महामंडळाच्या काही सुविधा चांगल्याच आहेत. परंतु बसेसमध्ये खासदार, आमदार, जि.प.सदस्य, अपंग, महिला, पत्रकार,जेष्ठ नागरिक यांच्याकरिता राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. एस.टीमध्ये चढल्यानंतर सीटच्या मागे अथवा खिडकीच्यावर ज्यांच्यासाठी सदरची जागा राखीव आहे, त्यांचे नाव स्पष्ठ शब्दात दिसेल असे लिहीलेले असते.
ज्या जागेवर नाव नाही त्या जागा सर्वसामान्य प्रवाशांच्या समजल्या जातात. ज्या उदात्त हेतूने आरक्षण देण्यात आले त्याची अंमलबजावणी मात्र शून्यच आहे.
आरक्षणाच्या अमंलबजावणीची जबाबदारी असलेले वाहक मात्र जाणीवपूर्वक यातून बगल काढतात. त्यामुळे महामंडळाच्या एसटीतील आरक्षणचा उपयोगच काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. परिणामी अपंग, महिला आणि पत्रकारांना आरक्षित जागा कधीच मिळत नाही. वृध्द, आजारी व्यक्तींना माणूसकी म्हणूनही जागा दिली जात नाही. मात्र, स्वतःसाठी आरक्षित असलेली जागा देणारे काही वाहक क्वचितच आहेत. ड्युटी संपवून घरी जाणाऱ्यांना वाहक – चालकांना स्वतः उभा राहून प्रवाशांना जागा देणे बंधनकारक आहे. तो देखील नियम कोणी पाळतच नाही.
सध्या लग्नसराई आणि येत्या काही दिवसात उन्हाळी सुट्टयांचा मौसम सुरु होत आहे. साहजिकच बसस्थानकावर प्रवाशांची झुंबड उडते. अशा स्थितीत बस स्थानकावर येवून उभी रहाताच तरूण आणि स्वतःला बुद्धीवान समजणाऱ्या व्यक्ती प्रचंड गर्दी करुन स्वतःसाठी जागा मिळवायची म्हणून खिडकीतून रुमाल, शेला, बॅग, वह्या अथवा तत्सम वस्तू टाकून जागा आरक्षित करतात. मात्र अपंग आणि महिलांना हे शक्य होत नाही. उलट बसमध्ये चढल्यावर गर्दीतून येणाऱ्या जाणाऱ्यांचे धक्के खात उभे रहावे लागते. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे.
याबाबत बोलताना एस.टी महामंडळाचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे म्हणाले, आम्ही दरवर्षी वारंवार याबाबत वाहक चालकांना सुचना देतो. बस सुरू होण्यापुर्वी आरक्षणासाठी महिला व अपंगांनी प्रवाशांशी वाद घालण्यापेक्षा ही बाब प्रथम वाहकाच्या निर्दशनास आणून द्यावी. तरी देखल आरक्षण मिळालेच नाही किंवा वहकांनी जबाबदारी झटकल्यास त्यांच्यावर कारवाई करु.
ह्यांची गजच काय…. आमदार, खासदार यांना गलेलठ्ठ मानधन आणि अवाढव्य सुविधा असल्याने ते बसचा प्रवास कधीच करताना दिसत नाहीत. त्यामुळे एस.टीबसमध्ये आमदार, खासदारांना जागा आरक्षित ठेवायच्याच कशाला? शिवाय बस ज्या ठिकाणाहून निघते तिथून तरी आरक्षित जागा संबंधितांना मिळणे आवश्यक असताना हे देखील होत नसल्याचेच चित्र आहे. |