प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मंदिरे गेल्या नऊ महिन्यांपासून बंद ठेवण्यात आली होती. आता मंदिरे खुली झाली आहेत. मात्र, यंदाची सौंदत्ती येथील रेणुकादेवीची माही पोर्णिमा यात्रा देवस्थान मंडळ व बेळगांव जिल्हा प्रशासन यांनी रद्द करण्यात आली असल्याचे सांगितले आहे. यामुळे कोल्हापुरातील ओढयावरील रेणुकादेवीची आंबिल यात्रा होणार की, नाही याविषयी भाविकांच्यात संभ्रमावस्था आहे. यासंदर्भात दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांची दोन दिवसांत भेट घेणार आहेत.
ओढयावरील आंबिल यात्रा होण्यासाठी मानाचे चार जग यांची चर्चा होणे आवश्यक आहे. यामध्ये रविवार पेठ, शुक्रवार पेठ, मंगळवार पेठ व आळवेकरांचा जग आदी जगांचा समावेश आहे. सौंदत्ती येथील यात्रा झाल्यानंतर सर्व जग गोकुळ शिरगांव येथे येतात. याठिकाणी विधीवत धार्मिक कार्यक्रम करून आंबलीच्या आदल्या दिवशी जग ओढयावरील रेणुका मदिरात येतात. आंबिल यात्रेवेळी दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, मंडळे, स्थानिक लोकप्रतिनीधी यांच्याकडून आंबिल वाटप, सरबत वाटप, शुभेच्छा व स्वागताचे डिजिटल फलक, खेळण्यांची दुकाने, झोपाळे आदींमुळे मोठया यात्रेचे स्वरुप असते. याची वर्षभर भाविकांच्या उत्सूकता लागून असते. तसेच घरातून जेवण घेऊन नैवद्य देऊन मंदिराच्या आवारात कुटुंबासह भोजनाचा आस्वाद घेतात. दुपारी चार वाजता देवीची पालखी सोहळा होतो. पी-ढबाक पारंपरिक वाद्यांच्या गजरात साडे आठच्या सुमारास मानाचे जग आप-आपल्या घरी जाण्यासाठी रवाना होतात. रात्री उशीरापर्यंत यात्रा सुरू राहते.
या यात्रेमध्ये कोल्हापूर शहर, उपनगर, ग्रामीण भागातील भाविक मोठया संख्येने सहभागी होतात. तसेच उदं गं आई उदं… चा जागर करत धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन देवीच्या दर्शनाचा लाभ घेतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ओढयावरील रेणुकादेवीची आंबिल यात्रा होणार की, नाही यासंदर्भात भाविकांमध्ये उत्सूकता शिगेला पोहोचली आहे. यासाठी रेणुकादेवी भक्त संघटना जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांना भेटून यात्रा होण्यासंदर्भात पाठपुरावा करणार आहेत.
जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांबरोबर होणार बैठक
30 डिसेंबर 2020 रोजी होणाऱ्या माही पार्णिमानंतर पुढील7 दिवसांनी कोल्हापुरातील ओढ्यावरच्या रेणुकादेवी मंदिरात कोल्हापुरातील आंबिल यात्रा होणार की नाही, याबद्दल भाविकांच्यात साशंकता आहे. अंबिलयात्रा कशा पद्धतीने साजरी करता येईल, यासंदर्भात लवकरच जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांची भेट घेण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा रेणुकाभक्त संघटनेच्या उपाध्यक्ष शालिनीताई सरनाईक व करवीर निवासीनी रेणुका भक्त सेवा संघटनेचे अध्यक्ष उदय पाटील यांनी मंगळवारी (दि. 1) झालेल्या बैठकीत जाहीर केले. या बैठकीला संघटनेचे पदाधिकारी प्रशांत खाडे, किरण मोरे, सुनिल मोहिते, बाबुराव पाटील, अनिता पोवार, सुभाष जाधव, अच्युतराव साळोखे, केशव माने, मोहन साळोखे, सुरेश बिरंबोळे, प्रदीप साळोखे, मंगल महाडिक, संजय मांगलेकर, अनिल देवणे आदी उपस्थित होते.