भाजप शिष्टमंडळाची मागणी
ऑनलाईन टीम / कोल्हापूर
महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पांमधील वर्षानुवर्षे पडून राहिलेला कचरा परस्पर शेतांमध्ये पसरून नागरिकांकडून परस्पर पैसे घेऊन घोटाळा केलेल्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा. तसेच संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने केली आहे. मागणी संदर्भातील निवेदन प्रशासन डॉक्टर कादंबरी बलकवडे यांना देण्यात आले. यावी प्रशासन डॉ. बलकवडे यांनी हा प्रकार गंभीर असून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
निवेदनात म्हटले आहे, लाईन बाजार येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पात गेली अनेक वर्षे लाखो टन घन कचरा पडून आहे. 2020 सालापासून हा कचरा हलविण्यासाठी बायोमायनिंग ची सुरुवात करण्यात आली. आज पर्यंत सुमारे 2 लाख क्यूबिक मिटर म्हणजे अंदाजे 1 लाख टन कचरा कमी झाल्याचे अधिकारी सांगत आहेत. परंतु हा कचरा कोणतीही प्रक्रिया न करता आणि कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय कसबा बावड्यातील काही शेतात टाकला जात असल्याचे भाजपाच्या कार्यकर्त्यांचा निदर्शनास आले. त्यामुळे भाजपाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदन देऊन वस्तुस्थितीची ताबडतोब पहाणी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यानी प्रत्यक्ष केलेल्या पाहणीत भाजपा ने केलेल्या आरोपात तथ्य असल्याचे आढळले व त्यावेळी केलेल्या पंचनाम्यात या भागात अशास्त्रीय पद्धतीने व पर्यावरणाची कोणतीही काळजी न घेता घनकचरा पसरल्याचे आढळले, असा उल्लेख अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, यामध्ये अधिकारी सहभागी असतील तर त्यांना बडतर्फ करावे. चौकशी होई पर्यंत ठेकेदारांची देयके देऊ नयेत आणि उघडपणे कायद्याचे उल्लंघन करून पर्यावरणाच्या ऱ्हासास कारणीभूत ठरलेल्या या ठेकेदाराला तातडीने ब्लॅकलिस्ट करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.
निवेदन देतेवेळी माजी नगरसेवक अजित ठाणेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विजयसिंह खाडे पाटील, प्रदीप उलपे, चंद्रकांत घाटगे आदी उपस्थित होते.