ग्रामीण भागातील तरूण देशोधडीला, ठोस कारवाई होणे गरजेचे
व्हनाळी / सागर लोहार
बँकांकडून सहज कर्ज पुरवठा उपलब्ध होत नसल्याने किरकोळ गरजांसाठीही शेतकऱ्यांना खासगी सावकारांकडून गरजेसाठी कर्ज घ्यावे लागते. थेट घरापर्यंत पोहोचणारा गरजू म्हणजे जणू काही सावजच आहे, अशा अविर्भावात खासगी सावकार कर्ज पुरवठा करतात. कर्जदारांची जमीन, घर किंवा किमती ऐवज तारण ठेवून मनमानी व्याजाची आकारणी करतात. विशेष म्हणजे सावकारीचा परवाना नसतानाही कायदा धाब्यावर बसवून कर्जदारांची लूट केली जाते,आता आलेली कोरोनाची महामारी ही अडचणीत सापडलेल्या नागरिकांचा विचार करता खासगी सावकरांच्या पत्यावरच पडत आहे. त्यामुळे खासगी सावकारांची पायमुळे अधिकच घट्ट होवू लागली आहेत.
कर्जाची गरज सर्वांनाच पडते. मात्र, किरकोळ कर्जासाठी बँका दारातही उभे करून घेत नाहीत, असा सार्वत्रिक अनुभव आहे. एखादी बँक कर्ज देण्यास तयार झालीच तर कागदपत्रांची पूर्तता करताना कर्जदाराची दमछाक होते. यातून त्याच्या हातात नेमकी कर्जाची किती रक्कम येईल, याबाबतही खात्री नसते. अशावेळी गरजूंना खासगी सावकार हाच जवळचा पर्याय वाटतो. कमी भांडवलात लाखो रुपये उकळता येत असल्याने कागल तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्याच्या गल्लीबोळात खासगी सावकार निर्माण झाले आहेत. दरमहा 10 ते ३० टक्क्यांपर्यंत व्याजाची वसुली करून कर्जदारांना देशोधडीला लावले जाते. कर्जाच्या वसुलीसाठी दमदाटी करणे, रात्रीअपरात्री घरात घुसून शिवीगाळ, मारहाण करण्याचे प्रकार नित्याचेच घडत आहेत. कर्जदारांने सावकरांच्या विरोधात तकार दिली तर सर्व रक्कम आताच भर असा दम देतात. प्रकरण वाढले तर वरिष्ठांशी ओळखीचा फायदा घेवून प्रकरण तितेच परस्पर मिटवून टाकतात. त्यामुळे शेवटी न्याय मिळणार नाही म्हणून आत्महत्येचा विचार केला तर मग कुटूंबियांचे काय होईल असा प्रश्न कर्जात बुडालेल्या तरूणांना पडला आहे.
कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या, व्यवसाय बंद पडले. मग इनकमच नाही तर व्याजाचा पैसा भरायचा तरी कसा जीवन जगायचे काय मरायचे हाच प्रश्न अनुत्तरीत आहे. सावकरांविरोधात कांही बोलल तर गावात राहणे व जगणे मुश्किलीचे बनले आहे त्यामुळे कचाट्यात सापडलेल्या कर्जदारांना न्याय देणार कोण असा प्रश्न सर्वानाच पडला आहे. कोरोनामुळे बॅंकाची वसूली थांबली पण खासगी सावकरांची वसुली कांही थांबेना. कांही सावकरांचा व्याज आकरणीचा 1 ते 20 दिवसांचाच महिना आहे व्याज थांबले तर तासाला पाच हजार रूपये दंड वसुल करतात. अलीकडे सर्वच क्षेत्रात खासगी सावकारी बोकाळली आहे. छोटे व्यावसायिक, बेरोजगार तरूण,भाजी विक्रेते, कामगार, मजूर यांच्या गळ्याभोवती खासगी सावकारीचा पाश अधिकच घट्ट होत चालला आहे.
राज्य सरकारने २०१४ मध्ये खासगी सावकारी कायद्यात सुधारणा करून सावकारांना हा कायदा बंधनकारक केला. कर्ज देण्यासाठीही सावकारांना नियमावली आहे. तारण कर्जासाठी वार्षिक १२ टक्के व्याजाची आकारणी करता येते, तर विनातारण कर्जासाठी वार्षिक १५ टक्के व्याजाची आकारणी करणे बंधनकारक आहे. मुद्दल रकमेपेक्षा व्याज जास्त घेऊ नये, कोऱ्या स्टॅम्पवर कर्जदाराच्या सह्या घेऊ नयेत, कर्ज वसुलीसाठी दमदाटी करू नये, त्याचबरोबर दर तीन महिन्याला त्याला मुद्दल आणि व्याज वसुलीची पावती द्यावी, अशी नियमावली खासगी सावकारांसाठी बंधनकारक केली आहे. प्रत्यक्षात मात्र विनापरवाना सावकारांचे जिल्ह्यात पेव फुटले आहे.
कर्जदाराची अडचण पाहून दर महिन्याला ५ ते ३० टक्के व्याजाची आकारणी केली जाते. वसुलीसाठी दमदाटी नेहमीचच आहे. भिशीच्या नावाखाली खासगी सावकारकी ग्रामिण भागात जोरात सुरू आहे. कसल्याही परवानगीशिवाय भिशी सुरू करायची. त्यात ठेवीदारांकडून जमा होणारी रक्कम थेट खासगी सावकारीसाठी वापरायची. कर्ज देताना भिशीप्रमाणे जामीनदार घ्यायचे. कर्जाची रक्कम मोठी असेल, त्या पटीत मालमत्तेची कागदपत्रे, धनादेश, घर, स्टॅंम्प असे तारण घ्यायचे. दरमहा अगर दिवसाकाठी मनमानी व्याज आकारायचे. कर्जाची फेड वेळेत न झाल्यास तारण मालमत्ता हडप करून मालामाल होण्याचा या सावकारांचा धंदा जोरात सूरू आहे.
खासगी अवैध सावकारी करणाऱ्यांनी जिल्ह्यात बस्तान बसवले आहे. अशा सावकारांची परिसरात दहशत वाढली आहे. त्यांच्याविरुद्ध कोणीही बोलत नाही. ग्रामीण भागात शेती, मुला-मुलींचे लग्न, पाल्यांचे शिक्षण, घर बांधकामासाठी पैशाची गरज लागते. यासाठी सावकार दागिने, शेती, प्लॉट,टू व्हिलर,फोर व्हिलर गाड्या व इतर वस्तू गहाण ठेवून २४ ते ४८ टक्के व्याज दराने शेतकरी, गरजूंना कर्ज देतात. परंतु, ते वसुली करताना मोठ्या प्रमाणात पिळवणूक करतात…