लॉकडाऊनने आणली उपासमारीची वेळ
जिल्ह्यात 28 कलापथके कार्यरत
कलाकारांना आर्थिक मदतीची गरज
अहिल्या परकाळे / कोल्हापूर
कलापथक, तमाशा, शाहीर यांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आजतागायत जीवंत ठेवली आहे. गेल्या सहा महिन्यापासून कोल्हापुरात 28 कलापथकांमधील जवळपास 1 हजार कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर कलापथकांचे निर्माते कर्जबाजारी झाले आहेत. सरकारने कलाकारांना आर्थिक मदत करावी. राज्य अनलॉककडे जात असताना इतर व्यवसायाप्रमाणे कलापथकांना परवानगी द्यावी अशी मागणी होत आहे.
कलापथकांना गतवर्षी महापुर आणि निवडणुकीचा फटका बसला आहे. गेल्या सहा महिन्यापासून देश लॉकडाऊन असल्याने मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यात गावागावात यात्रा, उरूस असतात. या यात्रांमध्ये कलापथकांना लाखो रूपयांचा फायदा होतो. परंतू कोरोनामुळे गावोगावच्या ग्रामदेवतांच्या यात्रा, जत्रा, उरूस रद्द केल्याने कलाकारांसह कलापथकाचे निर्मार्तेही बेरोजगार झाले आहेत. परिणामी कोट्यावधी रुपयांची उलाढाल अक्षरशः ठप्प होऊन कलावंताचा उत्पन्नाचा स्त्रोतच थांबला आहे. एका कलापथकाच्या निर्मात्याला 35 कलाकारांसह त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी घ्यावी लागते. या कलाकारांना सांभाळताना स्वत: निर्माते कर्जबाजारी झाले आहेत. आपले दु:ख बाजूला ठेवून इतरांचे मनोरंजन करणार्या कलाकारांना सरकार दरबारी वालीच राहिला नाही. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कलाकारांनी एकत्र येवून राज्यभर आंदोलन छेडले आहे. परंतू या कलाकारांकडे लक्ष देण्यासाठी सरकारला वेळ नाही, असा आरोप कलाकार पथकांकडून केला जात आहे.
जमावबंदी असल्याने प्रेक्षकांशिवाय कलाकार आपली कला सादर करू शकत नाहीत. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कलापथकांतील कलाकार इतर व्यवसायाकडे वळले आहेत. कलाकारांना आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी सरकारने कलाकारांना अनुदान दिले पाहिजे. 60 वर्षापुढील कलाकारांना दरमहा 5 हजार रूपये पेन्शन दिली पाहिजे. या मागण्यांसाठी यापुर्वी अनेक आंदोलने करून जिल्हाधिकारी, मुख्यमंत्र्यांना निवेदने दिली आहेत. भविष्यात अमरण उपोषण करण्याचा इशारा सरकारला दिला आहे. नवरात्रोत्सवात ही मंडळे कलापथकांच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले जाते. त्यामुळे दसऱयामध्ये कलापथकांना आपली कला सादर करण्यास परवानगी द्यावी. तरच कलाकार आणि महाराष्ट्राची कलासंस्कृती जगेल असा सूर कलाकार संघटनेचा आहे.
समाजप्रबोधनासह मनोरंजन
जिल्ह्यात सध्या 28 कलापथके कार्यरत असून यामध्ये प्रत्येकी 30 ते 35 कलाकारांना रोजगार मिळतो. स्वतःचे दुःख विसरुन समाजाचे प्रबोधनात्मक मनोरंजन या पथकातून केले जाते. आशा या समाजातील कष्टकरी वर्गाला शासनाने न्याय देण्याची गरज आहे.
कला जिवंत राहीली पाहिजे
निवडणूका, महापूर आणि कोरोनाचा फटका कलापथकांसह कलाकारांना बसला आहे. ही परिस्थिती किती दिवस राहणार हे कोणालाच माहित नाही. अशीच परिस्थिती राहिली तर कला नामशेष होईल. कला जिवंत ठेवण्यासाठी सरकारने कलापथकांना अनुदान देवून, कलासादरीकरणास परवानगी द्यावी.
-मुकुंद सुतार (अध्यक्ष : कोल्हापूर कलापथक निर्माता असोसिएशन)